तृणमूलचे बंडखोर खासदार नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीत होणार विलीन?

त्या मार्गाने एनडीएला पाठिंबा देण्याचा विचार

तृणमूलचे बंडखोर खासदार नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीत होणार विलीन?

रविवारी तृणमूल काँग्रेसमधील संकट आणखी गडद झाले. पक्षातील २० बंडखोर खासदारांनी केंद्रीय मंत्री भूपिंदर यादव यांची भेट घेतल्यानंतर दिल्लीतील लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांच्या निवासस्थानी पुन्हा बैठक घेतली.

माजी पश्चिम बंगाल मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय सुदीप बंदोपाध्याय यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भूपेंद्र यादव यांची भेट घेतल्यानंतर बंडखोर गटाला पाठिंबा दर्शविल्याच्या एका दिवसानंतर हा घडामोडींचा क्रम समोर आला. या बैठकीकडे बंडखोर खासदार, भाजपच्या अप्रत्यक्ष पाठिंब्याने, लोकसभा अध्यक्षांकडे “खरी तृणमूल काँग्रेस” म्हणून मान्यता मागू शकतात, अशा संकेत म्हणून पाहिले जात आहे. पण आता नवी बातमी समोर आली आहे की, या खासदारांचा गट त्रिपुरा आणि ईशान्येतील राज्यात असलेल्या नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टीत विलिन होण्याचा विचार करत असून त्या मार्गाने ते एनडीएला पाठिंबा देतील.

दरम्यान, सुदीप बंद्योपाध्याय म्हणाले की, बंडखोर खासदार आणि आमदारांच्या विनंतीनंतर ते या गटात सहभागी झाले. मात्र, लोकसभा अध्यक्षांना देण्यात येणाऱ्या पत्रावर त्यांनी अद्याप स्वाक्षरी केलेली नाही आणि ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीतच ते स्वाक्षरी करतील. बंडखोर खासदार नंतर ममता बॅनर्जी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे.

“बहुतेक खासदार आणि आमदारांना हा उपक्रम यशस्वी व्हावा असे वाटत होते. त्यांना पक्ष ममता बॅनर्जी यांच्या मार्गदर्शनाखाली चालू राहावा, त्या मुख्य सल्लागार आणि पक्ष नेत्या म्हणून भूमिका असाव्यात असे वाटत होते.

टीएमसीची संघटनात्मक फेररचना

संकट वाढत असताना टीएमसीने संघटनात्मक फेरबदल करत काही नेत्यांना महत्त्वाच्या पदांवरून हटवले. अर्णब बॅनर्जी यांची तृणमूल युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सयोनी घोष यांची जागा घेतली. तर अलिफा अहमद यांची महिला आघाडीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी माला रॉय यांची जागा घेतली.

तसेच, कुणाल घोष यांची उत्तर कोलकाता संघटनात्मक जिल्ह्याच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी सुदीप बंद्योपाध्याय यांची जागा घेतली. पक्षाने सौगत रॉय यांची लोकसभा गटाचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे. हा गट अजूनही ममता बॅनर्जी यांच्याशी निष्ठावान असलेल्या खासदारांचा आहे.

हे ही वाचा:

‘हेल्दी’ आणि ‘ऑर्गॅनिक’च्या नावाखाली ग्राहकांची दिशाभूल

रस्त्यालगत असलेल्या विहिरीत कोसळली पिक-अप, ८ ठार

वेदांताच्या चार नव्या कंपन्यांचे शेअर बाजारात पदार्पण

उत्तराखंडमध्ये भाजप कार्यकर्त्याची हातोड्याने हत्या

बंडखोर गटाचा दावा – “आम्हीच खरी टीएमसी”

बंडखोर खासदार जगदीश चंद्र बर्मा बासुनिया यांनी सांगितले की, त्यांचा गट सोमवारी लोकसभा अध्यक्षांची भेट घेऊन स्वतःला “खरी टीएमसी संसदीय गट” म्हणून मान्यता देण्याची मागणी करणार आहे. “आम्ही पत्र सादर केले आहे. सोमवारी आम्ही अध्यक्षांना भेटून खरी टीएमसी संसदीय गट स्थापन करण्याचा दावा करू. आमच्या दाव्याला मान्यता देण्याची विनंती करू,” असे ते म्हणाले.

दरम्यान, काकोली घोष दस्तिदार यांनी शनिवारी सांगितले की आणखी दोन खासदार बंडखोर गटात सामील होणार आहेत. त्यामुळे लोकसभेतील त्यांच्या गटाची संख्या २२ होईल. “आम्ही बैठकीसाठी दिल्लीला जात आहोत. आमच्यासोबत २२ खासदार आहेत. अध्यक्षांनी आम्हाला वेळ दिला आहे. सोमवारी आम्ही त्यांची भेट घेऊन स्वतंत्र गट म्हणून मान्यता मागणार आहोत,” असे त्यांनी सांगितले.

ममता गटाचा विरोध

टीएमसीने बंडखोरांच्या दाव्यांना फेटाळून लावले असून, पक्षांतरबंदी कायद्यानुसार संसदेत स्वतंत्र गट स्थापन करण्यास परवानगी नसल्याचे म्हटले आहे. राज्यसभा खासदार सागरिका घोष यांनी सांगितले की, “स्वतंत्र गटासाठी कोणतीही कायदेशीर तरतूद नाही. दहाव्या अनुसूचीनुसार मूळ पक्ष दुसऱ्या पक्षात विलीन झाल्यासच अपात्रतेपासून बचाव होऊ शकतो.”

त्या म्हणाल्या, “मूळ पक्षाने दुसऱ्या पक्षात विलीन होणे ही अत्यंत महत्त्वाची अट आहे. मूळ पक्षाच्या चिन्हावर निवडून येऊन संसदेत किंवा विधानसभेत स्वतंत्र गट स्थापन करण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नाही.” “कायदा स्पष्ट आहे. त्याच चिन्हावर निवडून येऊन सभागृहात स्वतंत्र गट चालणार नाही. नवीन पक्षात विलीन व्हा किंवा अपात्रतेला सामोरे जा,” असे त्यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर टीएमसीला खासदार आणि आमदारांमधील मोठ्या बंडखोरीचा सामना करावा लागत असून पक्ष गंभीर अंतर्गत संकटातून जात आहे.

Exit mobile version