विद्याविहारमधील सोसायटीबाहेर सुरू झालेले ‘पांढऱ्या पट्ट्या’चे लोण आता संपूर्ण मुंबईत पसरत चालले आहे. पदपथांवर बेकायदेशीरपणे मारण्यात येणाऱ्या या पांढऱ्या पट्ट्यांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आता आक्रमक पवित्रा घेतला असून, गिरगावात आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम २२३ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
गिरगावातील पदपथांवर पांढरे पट्टे मारण्यात आल्याने स्थानिक नागरिक आणि मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. हे पट्टे बेकायदेशीर असल्याचे सांगत, त्यांचा निषेध करण्यासाठी मनसैनिकांनी पट्ट्यांवर करड्या रंगाचा स्प्रे मारून विरोध प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी त्वरित कारवाई करत आंदोलक मनसैनिकांना ताब्यात घेतले. सरकारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
खरंच आहे, पंतप्रधान मोदी आणि नेहरू यांची तुलना होऊच शकत नाही !
नीट परीक्षेपूर्वी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी
मे महिन्यात दुचाकी विक्री १९ लाखांच्या पार
या कारवाईनंतर मनसेने मुंबई पोलिसांना आणि महापालिकेला थेट सवाल केला आहे. “आम्ही सार्वजनिक हितासाठी आणि रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात आवाज उठवत आहोत, मात्र शहरातील सार्वजनिक रस्त्यांवर आणि पदपथांवर कोणतीही अधिकृत परवानगी न घेता हे पांढरे पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई का केली जात नाही?” असा संतप्त सवाल मनसेकडून उपस्थित करण्यात येत आहे.
केवळ गिरगावच नव्हे, तर लालबाग आणि बोरिवलीसारख्या परिसरांमध्येही पांढऱ्या पट्ट्यांचा वाद उफाळून आला आहे. सोसायटीबाहेर किंवा दुकानाबाहेर जागा अडवण्यासाठी मारले जाणारे हे पट्टे आता मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरत असून, या मुद्द्यावरून येणाऱ्या काळात राजकीय आणि सामाजिक संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आता या संपूर्ण प्रकरणावर प्रशासन नेमकी काय भूमिका घेते आणि विनापरवाना पट्टे मारणाऱ्यांवर कारवाई होते का, याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.







