टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांच्या नेतृत्वाखालील तमिळनाडू सरकारने बुधवारी २३४ सदस्यीय विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मोठ्या बहुमताने जिंकला. विजय सरकारच्या बाजूने १४४ आमदारांनी मतदान केले, तर बहुमतासाठी ११८ मतांची गरज होती.
मात्र हा फ्लोअर टेस्ट विरोधी बाके रिकामी असतानाच पार पडला. द्रविड मुन्नेत्र कझगम (डीएमके) आणि देसिया मुरपोक्कू द्रविड कझगम (डीएमडीके) आमदारांनी सभात्याग केला, तर पीएमकेचे चार आणि भाजपाचा एक आमदार मतदानापासून दूर राहिले.
दरम्यान, ‘बंडखोर’ नेते षण्मुगम आणि एस. पी. वेलूमणी यांच्या नेतृत्वाखालील एआयडीएमके गटानेही विजय यांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिल्याचे दिसून आले. एआयडीएमकेच्या ४७ पैकी ३० आमदारांचा पाठिंबा या गटाला असल्याचे सांगितले जाते. आकडेवारीनुसार किमान २५ एआयडीएमके आमदारांनी मुख्यमंत्री विजय यांच्या बाजूने मतदान केले.
विजय यांच्या तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) ला आधीच १२० आमदारांचा पाठिंबा होता. मात्र एका आमदाराला मद्रास उच्च न्यायालयाने मतदानात सहभागी होण्यास बंदी घातल्याने संख्या एकाने कमी झाली होती. त्या आमदाराने निवडणूक अवघ्या एका मताने जिंकली होती. टीव्हीके व्यतिरिक्त सरकारला काँग्रेसच्या पाच आमदारांचा तसेच डाव्या पक्षांचे, व्हीसीके आणि मुस्लिम लीग यांच्या मिळून आठ आमदारांचा पाठिंबा मिळाला.
हे ही वाचा:
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ
आयात शुल्कवाढीनंतर सोने – चांदीच्या दरात विक्रमी वाढ
अमेरिकेतील संग्रहालयात भारताच्या ‘रॉकेट वुमन’ची साडी! जाणून घ्या खास महत्त्व
जे. जे. रुग्णालयातील निवासी डॉक्टरची आत्महत्या
डीएमते आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या सभात्यागानंतर, तसेच पाच आमदारांच्या मतदानापासून दूर राहिल्यामुळे, उपस्थित आणि मतदान करणाऱ्या आमदारांची संख्या कमी झाली. परिणामी, पलानीस्वामी (ईपीएस) गटातील फक्त २२ आमदारांनी टीव्हीके सरकारविरोधात मतदान केले.
विश्वासदर्शक ठरावानंतर आता एआयडीएमके मधील फूट हा मोठा राजकीय मुद्दा बनला आहे. ईपीएस यांच्या आदेशाला धुडकावून २५ आमदारांनी वेगळी भूमिका घेतल्याने त्यांच्या निष्ठेबाबत स्पष्ट संकेत मिळाले. त्यामुळे ईपीएस यांच्या गटात आता फक्त २२ आमदार उरल्याचे चित्र आहे.
मात्र, पक्षांतर विरोधी कायदा टाळून अधिकृतपणे टीव्हीकेमध्ये विलीन होण्यासाठी बंडखोर गटाला एआयडीएमकेच्या ४७ पैकी किमान ३१ आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या ते त्या आकड्यापासून दूर आहेत.
सभागृहात “हॉर्स ट्रेडिंग” झाल्याचा आरोप ईपीएस गटाने केला असताना, मुख्यमंत्री विजय यांनी आपल्या सरकारवर “घोड्याच्या वेगाने काम करणारे सरकार” अशी टिप्पणी केली. “आमचे सरकार घोड्याच्या वेगाने काम करते, पण हॉर्स ट्रेडिंग करत नाही,” असे विजय यांनी विधानसभेत सांगितले. तसेच त्यांचे सरकार कायम धर्मनिरपेक्ष राहील आणि मागील सरकारांनी सुरू केलेल्या कल्याणकारी योजना सुरू ठेवेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
