महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) बुधवारी राज्यभरात मोठी कारवाई करत पाकिस्तानस्थित गुंड शहजाद भट्टीच्या सिंडिकेटवर हल्ला चढवला. मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यातील ४० हून अधिक ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकण्यात आले असून, भट्टीच्या संपर्कात असलेल्या किमान ५३ संशयितांची कसून चौकशी सुरू आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय तरुणांना भडकवून त्यांना देशविरोधी कारवायांकडे वळवण्याचा भट्टीचा डाव एटीएसने उधळून लावला आहे.
एटीएसच्या पथकांनी बुधवारी पहाटेपासूनच संशयितांच्या ठिकाणांवर छापेमारी सुरू केली होती. यामध्ये प्रामुख्याने खालील शहरांचा समावेश आहे. मुंबई शहर, मीरा रोड (ठाणे) आणि नालासोपारा (पालघर),नाशिक आणि जळगाव,नागपूर आणि अकोला, पुणे आणि नांदेड या ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयने शहजाद भट्टीच्या मॉड्यूलचा वापर करून भारतात मोठ्या घातपाताचा कट रचला होता. गेल्या आठवड्यात झालेल्या तपासात असे निष्पन्न झाले की, दिल्लीतील एक ऐतिहासिक मंदिर, दिल्ली-सोनीपत महामार्गावरील प्रसिद्ध ढाबा आणि हरियाणामधील एका लष्करी छावणीवर हल्ल्याची योजना आखण्यात आली होती.
“परदेशात बसलेला शहजाद भट्टी सोशल मीडियाचा वापर करून महाराष्ट्रातील तरुणांशी संपर्क साधत होता. त्यांना पैशांचे आमिष दाखवून किंवा चिथावणी देऊन गुन्हेगारी आणि देशविरोधी कृत्यांकडे वळवण्याचा त्याचा प्रयत्न होता,” अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अलीकडेच गँग बस्ट ऑपरेशन २.०’ अंतर्गत ४८२ गुंडांना अटक केली होती. यामध्ये भट्टीच्या नऊ प्रमुख हस्तकांचा समावेश होता. त्यांच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे महाराष्ट्र एटीएसने राज्यातील संशयितांची यादी तयार केली होती. या आरोपींना उत्तर भारतात सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करणे आणि शस्त्रास्त्रांची तस्करी करण्याचे काम सोपवण्यात आले होते.एटीएस सध्या या ५३ संशयितांच्या डिजिटल उपकरणांची आणि आर्थिक व्यवहारांची तपासणी करत असून, या मोहिमेतून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.







