मुंबई : भायखळा येथे मंगळवारी झालेल्या गोळीबार प्रकरणाचा उलगडा करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले असून या प्रकरणी दोन शूटरना अटक करण्यात आली आहे. साजिद शेख आणि अन्वर शेख अशी अटक आरोपींची नावे असून त्यांना माहीम परिसरातून ताब्यात घेण्यात आले. पैशांच्या वादातून समीर शेख याच्या हत्येची सुपारी ‘मस्तान’ नावाच्या व्यक्तीने दिल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
भायखळ्यातील डॉकयार्ड रोड परिसरात मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास समीर आसिफ शेख (३७) याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या हल्ल्यात समीरच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
घटनेची माहिती मिळताच भायखळा पोलिस ठाण्याचे अधिकारी आणि मुंबई गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत हल्लेखोरांची ओळख पटवली. त्यानंतर गुन्हे शाखा कक्ष ३ च्या पथकाने साजिद आणि अन्वर या दोघांना माहीम परिसरातून अटक केली.
हे ही वाचा:
मंत्र्यांच्या ताफ्यात कपात, विदेश दौऱ्यांवर निर्बंध; फडणवीस यांची काटकसरीची भूमिका
चार दिवसांच्या घसरणीनंतर बाजार हिरव्या निशाणावर
मतीन पटेलला आलिशान घर बांधून देऊ!
ट्रम्प-शी भेटीपूर्वी कच्च्या तेलाच्या दरात घसरण
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, समीर शेख हा जुनी इमारती पाडण्याचे कंत्राट घेण्याचा व्यवसाय करतो. या व्यवसायात मस्तान नावाच्या व्यक्तीची भागीदारी होती. मात्र आर्थिक व्यवहारांवरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला होता. त्यातूनच मस्तान याने समीरच्या हत्येची सुपारी अटक आरोपींना दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
दरम्यान, जखमी समीर शेख हा आसिफ दाढी याचा मुलगा आहे. आसिफ दाढी हा एकेकाळी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा निकटवर्तीय मानला जात होता. त्यामुळे या गोळीबार प्रकरणामुळे मुंबईच्या गुन्हेगारी विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.







