महिला टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताचा अभियानाचा श्रीगणेशा रविवारी पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे माजी सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी भारतीय संघाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. त्यांच्या मते, स्पर्धेत केवळ सामने जिंकणे पुरेसे नाही, तर मोठ्या फरकाने विजय मिळवणेही तितकेच आवश्यक आहे.
इंग्लंडमधील अनिश्चित हवामानाचा उल्लेख करत नायर म्हणाले की, पावसामुळे सामने कमी षटकांचे होऊ शकतात किंवा रद्दही होऊ शकतात. अशा परिस्थितीत नेट रनरेट (NRR) उपांत्य फेरीतील पात्रता निश्चित करण्यात निर्णायक ठरू शकतो.
नायर यांनी ‘जिओस्टार’शी बोलताना सांगितले, “भारताने केवळ विजयावर लक्ष केंद्रित करू नये. मोठ्या फरकाने जिंकणे महत्त्वाचे आहे. प्रथम फलंदाजी करून मोठी धावसंख्या उभारणे, प्रतिस्पर्ध्यांना कमी धावांत रोखणे आणि सामने लवकर संपवणे आवश्यक ठरेल. नेट रनरेट स्पर्धेचे चित्र बदलू शकतो.”
ऑस्ट्रेलिया-बांगलादेशपूर्वी पात्रता जवळपास निश्चित हवी
नायर यांच्या मते, गट टप्प्यातील अखेरचे सामने ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेशसारख्या मजबूत संघांविरुद्ध असल्याने त्याआधीच भारताने उपांत्य फेरीची वाट जवळपास मोकळी करून ठेवावी.
“ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे आव्हानात्मक संघ आहेत. त्या सामन्यांमध्ये पात्रतेचे गणित डोक्यात ठेवून खेळण्याची वेळ भारतावर येऊ नये. त्यामुळे सुरुवातीपासूनच मोठे विजय मिळवणे गरजेचे आहे,” असे नायर म्हणाले.
पाकिस्तानवरच अधिक दबाव
भारताला स्पर्धेतील प्रमुख दावेदार मानले जात असले तरी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात दबाव अधिक प्रतिस्पर्धी संघावरच असेल, असे नायर यांचे मत आहे.
“महिला क्रिकेटमध्ये कौशल्य, अनुभव आणि संघसंतुलनाच्या बाबतीत भारत पाकिस्तानपेक्षा खूप पुढे आहे. पाकिस्तानकडे काही गुणवान खेळाडू आहेत, पण त्यांच्यात सातत्याचा अभाव आहे. फलंदाजी काही मोजक्या खेळाडूंवर अवलंबून आहे आणि गोलंदाजीदेखील दबावाखाली डळमळू शकते. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला वनडे विश्वचषक २०२५ चे विजेतेपद जिंकल्यानंतर भारतीय महिला संघ आता टी-२० विश्वचषक जिंकण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. मात्र त्यासाठी सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी आणि नेट रनरेट मजबूत ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.







