राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकलेले अनुभवी बॉक्सर मनोज कुमार यांनी बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (बीएफआय) च्या नव्या खेळाडू मूल्यांकन प्रणालीच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. या नव्या प्रणालीच्या आधारे २०२६ राष्ट्रकुल स्पर्धा आणि २०२६ आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय बॉक्सरची निवड केली जाणार आहे.
बीएफआयने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या मूल्यांकन नियमांवर प्रतिक्रिया देताना मनोज कुमार यांनी निवड प्रक्रियेत माजी खेळाडू, अर्जुन पुरस्कार विजेते, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आणि ऑलिम्पियन यांचा समावेश नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
मनोज कुमार यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले, “संपूर्ण निवड प्रक्रिया फक्त मुख्य प्रशिक्षक, पंच आणि फेडरेशनपुरतीच मर्यादित ठेवण्यात आली आहे. माजी अर्जुन पुरस्कार विजेते, द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, ऑलिम्पियन आणि वरिष्ठ खेळाडूंना निरीक्षक किंवा निवड प्रक्रिया मॉनिटर म्हणून का सामावून घेतले गेले नाही?”
त्यांनी पुढे म्हटले की, ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता विजेंदर सिंग आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अखिल कुमार यांसारख्या अनुभवी खेळाडूंचा सहभाग असता, तर निवड प्रक्रिया अधिक विश्वासार्ह आणि पारदर्शक झाली असती.
बीएफआयने यापूर्वी १३ ते १५ मेदरम्यान एनएस-एनआयएस पतियाळा येथे होणाऱ्या एलिट नॅशनल कॅम्पर्ससाठी सुधारित मूल्यांकन प्रणालीची घोषणा केली होती.
नव्या प्रणालीअंतर्गत ‘५-जज स्कोअरिंग सिस्टम’च्या आधारे खेळाडूंचे मूल्यांकन केले जाणार आहे. ही पद्धत अधिक अचूक निकाल मिळवण्यासाठी लागू करण्यात आल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले आहे.
मुक्केबाजी स्पर्धांमध्ये ज्या पद्धतीने गुणांकन केले जाते, त्याच धर्तीवर प्रत्येक स्पॅरिंग बाऊटनंतर लगेच गुण जाहीर केले जाणार आहेत.
बीएफआयने यापूर्वी वापरण्यात येणारी मार्किंग प्रणाली आता लागू केली जाणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, रविवारी खेळाडूंवर घेण्यात आलेल्या स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग चाचण्या रद्द करण्यात आल्या आहेत. स्पोर्ट्स सायन्स टेस्ट, वजन नियंत्रण, आरोग्य व्यवस्थापन आणि उपस्थिती यासाठी देण्यात आलेले गुणही मागे घेण्यात आले असून ते रद्द मानले जाणार आहेत.
बीएफआयचे सचिव प्रमोद कुमार यांनी सांगितले की, “राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई स्पर्धा आणि इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंची निवड १३ ते १५ मेदरम्यान एनएस-एनआयएसमध्ये सुरू असलेल्या एलिट नॅशनल कॅम्पदरम्यान केली जाईल. ही निवड नव्या नियमांनुसार होणार आहे.”
