टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारतीय संघाने दमदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केले. ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा ५ विकेट्सनी पराभव केला. १९६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने १९.२ षटकांत लक्ष्य गाठले. हा टी-२० विश्वचषकातील भारताचा सर्वात मोठा यशस्वी धावांचा पाठलाग ठरला.
१९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात समाधानकारक झाली नाही. अभिषेक शर्मा अवघ्या १० धावांवर बाद झाला, तर ईशान किशनलाही जेसन होल्डरने १० धावांवर माघारी धाडले. ४१ धावांत २ विकेट्स गमावल्यानंतर संघ अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीत संजू सॅमसन आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५८ धावांची भागीदारी करत डाव सावरला. सूर्यकुमार १६ चेंडूत १८ धावा करून बाद झाला.
मात्र त्यानंतर संजू सॅमसनने एका बाजूने जबाबदारी स्वीकारत आक्रमक फलंदाजी कायम ठेवली. त्याने उत्कृष्ट खेळ करत नाबाद ९७ धावांची खेळी साकारली. या खेळीत त्याने १२ चौकार आणि ४ षटकार लगावत एकूण १६ बाउंड्री मारल्या. तिलक वर्माने १५ चेंडूत २७ धावा केल्या, तर हार्दिक पांड्याने १४ चेंडूत १७ धावांचे योगदान दिले. अखेरीस शिवम दुबे ८ धावांवर नाबाद राहिला आणि भारताने १९.२ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ४ बाद १९५ धावा उभारल्या. रोस्टन चेजने २५ चेंडूत ४० धावांची खेळी केली. जेसन होल्डरने २२ चेंडूत ३७ धावा केल्या, तर रोवमन पॉवेलने १९ चेंडूत नाबाद ३४ धावा करत संघाला भक्कम शेवट दिला. होल्डर आणि पॉवेल यांनी पाचव्या विकेटसाठी ३५ चेंडूत ७६ धावांची नाबाद भागीदारी केली.
भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ४ षटकांत ३६ धावा देत २ विकेट्स घेतल्या. वरुण चक्रवर्ती आणि हार्दिक पांड्या यांनी प्रत्येकी १ विकेट मिळवली. या पराभवासह वेस्ट इंडिजचा टी-२० विश्वचषक २०२६ मधील प्रवास संपुष्टात आला असून भारताने अभिमानास्पद कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.







