भारतीय क्रिकेट संघात वेगवान गोलंदाज म्हणून ओळख मिळवणारा हर्षित राणा गेल्या एका वर्षात सातत्यपूर्ण कामगिरीमुळे चर्चेत आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये प्रभावी गोलंदाजी करताना राणाला अनेकदा फलंदाजीचीही संधी मिळताना दिसते. यामागे संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर असल्याचं बोललं जात होतं, मात्र राणाने हे मत स्पष्टपणे फेटाळून लावलं आहे.
वडोदऱ्यात न्यूझीलंड विरुद्ध पहिला एकदिवसीय सामना जिंकल्यानंतर राणाने आपल्या फलंदाजीमागील खरी प्रेरणा सांगितली. “माझ्या फलंदाजीची सुरुवात पप्पांनीच करून दिली. लहानपणापासूनच ते माझ्या फलंदाजीवर लक्ष देत आले आहेत. त्यांचं एकच मत होतं — भारतात ऑलराउंडरला संधी लवकर मिळते, त्यामुळे गोलंदाजीसोबत फलंदाजीही तितकीच महत्त्वाची आहे,” असं राणाने सांगितलं.
राणा पुढे म्हणाला, “प्रत्येक सामन्यानंतर पप्पांचा फोन येतोच. या सामन्यात मी अवघे २०-२५ धावा करून बाद झालो, त्यामुळे त्यांच्याशी बोलताना थोडी भीती वाटत होती,” अशी भावना त्याने हसत व्यक्त केली.
या वक्तव्यातून स्पष्ट होतं की, हर्षित राणाने केवळ वेगवान गोलंदाज म्हणून नव्हे, तर फलंदाज म्हणूनही स्वतःला घडवण्यासाठी लहान वयापासूनच मेहनत घेतली आहे — आणि त्यामागे त्याच्या वडिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात राणाने अष्टपैलू कामगिरी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. गोलंदाजी करताना १० षटकांत ६५ धावा देत २ विकेट्स घेतल्या, तर फलंदाजी करताना अवघ्या २३ चेंडूत २९ धावांची झुंजार खेळी केली.
हेही वाचा:
जैश प्रमुख मसूद अझहर म्हणतो, “हजारो आत्मघाती हल्लेखोर भारतात जाण्यास तयार”
“निवडणुकीतील लढाई मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी नसून ठाकरे बंधूंच्या अस्तित्वासाठी”
राष्ट्रीय शेअर बाजारात २०२५मध्ये निफ्टी भक्कम, आयपीओ बाजारात महाराष्ट्र अव्वल
वसई विरार मनपातील १३७ उमेदवाऱ्या संकटात?
सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेतही राणा म्हणाला, “संघ व्यवस्थापन मला ऑलराउंडर म्हणून तयार करत आहे. खालच्या फळीत गरज पडल्यास धावा काढता याव्यात, हीच अपेक्षा आहे.”
न्यूझीलंडने दिलेलं ३०१ धावांचं आव्हान भारताने ४९ षटकांत ६ विकेट्स गमावत पूर्ण केलं. या सामन्यात ९३ धावांची दमदार खेळी करणाऱ्या विराट कोहली याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ घोषित करण्यात आलं.







