भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट इतिहासातील महान फलंदाजांपैकी एक मानले जाते. आपल्या अप्रतिम फलंदाजीने त्यांनी क्रिकेट अधिक रोमांचक केले आणि अनेक जागतिक विक्रम आपल्या नावावर केले.
१६ मार्च हा दिवस सचिन आणि क्रिकेटविश्वासाठी अत्यंत खास आहे. कारण १६ मार्च २०१२ रोजी सचिनने असा पराक्रम केला होता, जो यापूर्वी क्रिकेटमध्ये कधीच झाला नव्हता आणि भविष्यातही तो मोडणे अत्यंत कठीण मानले जाते.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे सामना मीरपूरच्या शेर-ए-बांग्ला स्टेडियममध्ये खेळला गेला होता. प्रथम फलंदाजी करताना भारताने ५ बाद २८९ धावा केल्या. या सामन्यात सचिन तेंडुलकरने १४७ चेंडूत ११४ धावा करत आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ऐतिहासिक १००वे शतक झळकावले. क्रिकेट इतिहासात १०० आंतरराष्ट्रीय शतकांचा टप्पा गाठणारा तो एकमेव फलंदाज आहे.
विशेष म्हणजे हे सचिनचे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचे शतक ठरले.
१९८९ ते २०१३ या काळात सचिन भारतीय फलंदाजीचा प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांच्या नावावर सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने, सर्वाधिक शतके, सर्वाधिक धावा, सर्वाधिक टेस्ट आणि वनडे सामने असे अनेक विक्रम आहेत. वनडेमध्ये पहिले दुहेरी शतक झळकावण्याचा मानही सचिनलाच मिळाला.
सचिनने २०० कसोटी सामन्यांच्या ३२९ डावांत ५१ शतकांसह १५,९२१ धावा केल्या. तर ४६३ वनडे सामन्यांत ४९ शतके आणि ९६ अर्धशतकांसह १८,४२६ धावा केल्या. वनडेमधील त्यांचा सर्वोच्च स्कोअर नाबाद २०० आहे.
२०११ च्या वनडे विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचा सचिन भाग होते. त्यांनी १६ नोव्हेंबर २०१३ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र त्यांचे विक्रम आणि योगदान क्रिकेटविश्वात कायम स्मरणात राहतील.







