अहमदाबाद येथे रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी२० विश्वचषक २०२६ चा ‘सुपर-८’ सामना रंगणार आहे. या दोन संघांदरम्यान आतापर्यंत एकूण ३५ टी२० सामने खेळले गेले असून, या लढतींमध्ये केवळ २ फलंदाजांना शतक झळकावता आले आहे – आणि विशेष म्हणजे हे दोघेही भारतीय खेळाडू आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावणाऱ्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. या दोघांनीही प्रत्येकी २ शतके झळकावली आहेत.
संजू सॅमसनने २०२४ पासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकूण ५ टी२० सामने खेळले आहेत. ८ नोव्हेंबर २०२४ रोजी त्याने पहिले शतक झळकावले. त्या सामन्यात सलामीला उतरून सॅमसनने ५० चेंडूंमध्ये १०७ धावा केल्या. त्याच्या खेळीमध्ये १० षटकार आणि ७ चौकारांचा समावेश होता. भारताने हा सामना ६१ धावांनी जिंकला.
याच मालिकेत १५ नोव्हेंबर २०२४ रोजी जोहान्सबर्ग येथे सॅमसनने ५६ चेंडूंमध्ये ९ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद १०९ धावा केल्या. भारताने हा सामना तब्बल १३५ धावांनी जिंकत मालिका गाजवली.
दुसरीकडे, तिलक वर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १० सामन्यांत २ शतके झळकावली आहेत. नोव्हेंबर २०२४ मध्ये त्याने सलग दोन सामन्यांत शतकांची आतषबाजी केली. १३ नोव्हेंबर रोजी त्याने ५६ चेंडूंमध्ये ७ षटकार आणि ८ चौकारांसह नाबाद १०७ धावा केल्या. भारताने हा सामना ११ धावांनी जिंकला.
यानंतर १५ नोव्हेंबर रोजी तिलक वर्माने ४७ चेंडूंमध्ये १० षटकार आणि ९ चौकारांच्या मदतीने नाबाद १२० धावांची तुफानी खेळी साकारली. भारताने हा सामना १३५ धावांनी जिंकला.
एकूण ३५ टी२० सामन्यांमध्ये भारताचे पारडे जड राहिले आहे. भारताने २१ सामने जिंकले असून दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले आहेत. तर १ सामना अनिर्णित राहिला आहे.







