पाकिस्तान क्रिकेट संघाचा निराशाजनक कामगिरीचा सिलसिला कायम आहे. विश्वचषकातील खराब प्रदर्शनानंतर आता पाकिस्तानला बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतही पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी ढाकामध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या वनडेत झालेल्या पराभवासह पाकिस्तानने मालिका २-१ ने गमावली. या पराभवानंतर पाकिस्तान संघ पुन्हा एकदा टीकाकारांच्या निशाण्यावर आला आहे.
पाकिस्तानचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज कामरान अकमल यांनी संघाच्या कामगिरीवर टीका करताना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (PCB) अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्यावरही जोरदार टोला लगावला.
पाकिस्तानमधील एका क्रिकेट टीव्ही शोमध्ये बोलताना अकमल म्हणाले,
“पाकिस्तान संघाची अवस्था इतकी वाईट झाली आहे की नेदरलँड्ससारखा संघही आम्हाला हरवू शकतो. नेदरलँड्सलाही आता वाटत असेल की पाकिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची मालिका मिळाली तर ते आम्हाला हरवू शकतात. आमचा दर्जा खूपच घसरला आहे. देवासाठी पाकिस्तान क्रिकेटबद्दल विचार करा. तुम्ही स्वतःच्या क्रिकेटची थट्टा करून ठेवली आहे.”
यावरच न थांबता अकमल यांनी पीसीबी अध्यक्ष मोहसिन नकवी यांच्यावर उपरोधिक टिप्पणी केली. ते म्हणाले,
“आता काय आयसीसीची ट्रॉफी चोरी करून आणण्याचा विचार आहे का?”
दरम्यान, आशिया कप २०२५ मध्ये भारताने अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून विजेतेपद पटकावले होते. त्या वेळी भारतीय खेळाडूंनी ट्रॉफी मोहसिन नकवी यांच्या हातून स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यानंतर नकवी ट्रॉफी घेऊन निघून गेल्याची घटना चर्चेत आली होती. त्या घटनेनंतर नकवी यांच्यावर ट्रॉफी “चोरी” केल्याचे आरोप सोशल मीडियावर होत होते. आता पहिल्यांदाच एखाद्या मोठ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूने सार्वजनिकरित्या यावर टीका केली आहे.
टी२० विश्वचषक २०२६ मध्ये सुपर-८ फेरीत खराब कामगिरीमुळे पाकिस्तान बाहेर पडला होता. त्यानंतर बांगलादेश दौऱ्यावर गेलेल्या पाकिस्तानने ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत २-१ असा पराभव स्वीकारला.







