कॅनडातील विनीपेग येथे पार पडलेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्रातील युवा खेळाडूंनी राज्याचे नाव उज्ज्वल केले आहे.
महाराष्ट्राच्या प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य पदके जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली. तसेच गाथा आनंदराव खडके आणि शर्वरी सोमनाथ शेंडे यांनी कांस्य पदक जिंकून महाराष्ट्राच्या विजयाचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावला. विशेष म्हणजे गाथा आणि शर्वरी यांनी अचूक निशाणा साधत प्रतिस्पर्धी अमेरिका संघावर हा एकतर्फी विजय मिळविला आहे.
या यशाबद्दल समाजताच क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी खेळाडू आणि प्रशिक्षकांना त्वरित संदेश पाठवून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
“अचूक निशाणा साधत पदकावर कोरलेले भारताचे नाव म्हणजे देशवासियांसाठी आणि महाराष्ट्रासाठी सार्थ अभिमानाचा क्षण आहे. हे यश अथक परिश्रम, कठोर मेहनत, संयम, जिद्द आणि कौशल्याची जिवंत साक्ष आहे. या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनःपूर्वक मंगलकामना! आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. आपला विजय पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल,” असे मंत्री कोकाटे यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे.
खेळाडूंच्या या भव्य यशामुळे महाराष्ट्रातील युवा पिढीला नवे प्रेरणास्थान लाभले असून, राज्य सरकार त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचेही मंत्री महोदयांनी सांगितले.
खेळाडू आणि प्रशिक्षकांनी देखील क्रीडा मंत्र्यांनी तत्परता दाखवत केलेल्या अभिनंदन संदेशाला उत्तर देत आभार मानले आहेत.







