भारतीय संघाचे माजी सलामीवीर आकाश चोप्रा यांनी आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी)चा कर्णधार ऋषभ पंत याच्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. पंत स्वतःच्या प्रतिमेचा कैदी झाला असून, चांगल्या कामगिरीसाठी त्याने आपल्या खेळाचा पुनर्विचार करण्याची गरज असल्याचं त्यांनी म्हटलं.
आकाश चोप्रा यांनी जिओहॉटस्टारवर बोलताना सांगितलं, “ऋषभ पंत नेहमीच धोकादायक फटके खेळतो, जे अनेकदा त्याच्याच विरोधात जातात. भारतीय टी२० संघात पुन्हा स्थान मिळवायचं असेल, तर त्याने पुन्हा एकदा मूलभूत तंत्राकडे वळायला हवं.”
ते पुढे म्हणाले, “पंतवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. तो वेगवेगळे शॉट्स खेळण्याच्या स्वतःच्या प्रतिमेचा कैदी बनला आहे. परिस्थितीनुसार खेळण्याऐवजी तो सतत रिस्की शॉट्स खेळतो आणि त्यामुळे नुकसान होतं. मागील हंगामातही त्याला वेळ घेऊन फॉर्म परत मिळवण्याची संधी होती, पण त्याने ती गमावली.”
चोप्रा यांनी नमूद केलं की, बार्बाडोस येथे भारताने जिंकलेल्या टी२० विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असूनही पंत सध्या राष्ट्रीय संघात परतण्याच्या शर्यतीत मागे पडला आहे. निवड समितीने ओपनिंग करणारा आणि तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकणारा विकेटकीपर निवडला आहे. “आयपीएल मोठं व्यासपीठ असलं तरी भारतासाठी खेळणं हीच सर्वोच्च प्राथमिकता आहे,” असं त्यांनी सांगितलं.
तसेच, कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी असूनही पंतची फलंदाजीची पद्धत माजी प्रशिक्षक राहुल द्रविड यांना पूर्णपणे पसंत नव्हती, असंही चोप्रा म्हणाले. मात्र, पंतने माजी ऑलराउंडर युवराज सिंहकडून मार्गदर्शन घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे, हे त्याच्या खेळात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सकारात्मक पाऊल असल्याचं त्यांनी नमूद केलं.
मागील आयपीएल हंगामात पंतने १३ सामन्यांत केवळ २४.४५ च्या सरासरीने २६९ धावा केल्या होत्या.
आयपीएल २०२६ मध्ये एलएसजीला पंतकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. एलएसजी आपला पहिला सामना १ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध इकाना स्टेडियमवर खेळणार आहे.







