लखनौ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयनका यांनी कर्णधार ऋषभ पंतबाबत सुरू असलेल्या सर्व अफवा फेटाळून लावल्या आहेत. काही अहवालांमध्ये आयपीएल २०२६पूर्वी पंतला कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते, असा दावा केला जात होता, मात्र गोयनका यांनी या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचे स्पष्ट केले.
गोयनका यांनी सांगितले की, या केवळ ‘फेक रिपोर्ट्स’ आहेत आणि संघाचा पंतवर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी पंतच्या स्वभाव आणि समर्पणाचे कौतुक करत आगामी हंगामासाठी शुभेच्छाही दिल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्यांनी लिहिले, “ऋषभ पंतच्या कर्णधारपदाबाबतच्या चर्चा वाचल्या आणि मला हसू आले. आम्ही त्याच्या स्वभाव आणि बांधिलकीला चांगले ओळखतो. तुझा हंगाम उत्तम जावो, कॅप्टन.”
खरं तर, आयपीएल २०२५मध्ये पंतची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नव्हती. लखनौने त्याला मेगा लिलावात २७ कोटी रुपयांना विकत घेतले होते, त्यामुळे त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, पंतला फलंदाजीत संघर्ष करावा लागला आणि त्याने १३ सामन्यांत फक्त २६९ धावा केल्या. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. याच पार्श्वभूमीवर आयपीएल २०२६मध्ये लखनौ नवा कर्णधार निवडू शकते, अशा चर्चा रंगल्या होत्या.
आयपीएल २०२५दरम्यानही अशाच प्रकारची बातमी समोर आली होती. एका ‘एक्स’ वापरकर्त्याने पंतला पुढील हंगामापूर्वी संघातून वगळण्याचा सल्ला दिला होता. त्यावर पंतने उत्तर देत, अफवा पसरवण्यापूर्वी विचार करण्याचे आवाहन केले होते.
गोयनका यांच्या या विधानानंतर स्पष्ट झाले आहे की संघ व्यवस्थापन पंतच्या पाठीशी ठामपणे उभे आहे आणि त्याला कर्णधार म्हणून पूर्ण पाठिंबा आहे. आता सर्वांची नजर आयपीएल २०२६कडे लागली असून, पंत स्वतःला सिद्ध करण्यासाठी सज्ज आहे. लखनौ सुपर जायंट्स १ एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध लखनौच्या इकाना स्टेडियमवर आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे.







