टी-२० विश्वचषकाच्या सुपर-८ फेरीतील पहिल्या सामन्यात भारत रविवारी नरेंद्र मोदी स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मैदानात उतरणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये अव्वल स्थान पटकावून सुपर-८ मध्ये दाखल झालेल्या टीम इंडियासाठी मात्र सलामी जोडी हा चिंतेचा विषय ठरला आहे. त्यामुळेच आता प्लेइंग इलेव्हनमध्ये मोठा बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.
विश्वचषकापूर्वी धडाकेबाज फॉर्ममध्ये असलेला आणि टी-२० क्रमवारीत अव्वल असलेला अभिषेक शर्मा स्पर्धेत मात्र पूर्णपणे अपयशी ठरला आहे. आतापर्यंतच्या तीन सामन्यांत तो एकदाही खाते उघडू शकलेला नाही. सलग अपयशामुळे त्याचा आत्मविश्वास डळमळीत झाल्याचे स्पष्ट दिसत आहे.
याच पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात अभिषेकऐवजी संजू सॅमसनला संधी मिळू शकते, अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे. ईशान किशनसोबत संजूला सलामीला पाठवण्याचा विचार संघव्यवस्थापन करत असल्याचे संकेत मिळत आहेत.
शुक्रवारी सायंकाळी कृत्रिम प्रकाशझोतात झालेल्या सराव सत्रात संजू सॅमसनने दीर्घकाळ फलंदाजीचा सराव केला. वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटू या दोघांविरुद्ध त्याने आत्मविश्वासाने फटकेबाजी करत चांगला टच दाखवला. विशेष म्हणजे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी अभिषेक शर्मासोबत दीर्घ चर्चा केली आणि त्यानंतर स्वतः संजूला गोलंदाजी करताना दिसले. या घडामोडींमुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल निश्चित मानला जात आहे.
भारतीय संघात डावखुऱ्या फलंदाजांची संख्या अधिक असल्याने प्रतिस्पर्धी संघ त्याचा फायदा घेत आहेत. त्यामुळे संतुलन राखण्यासाठीही संजूला संधी दिली जाऊ शकते.
विशेष म्हणजे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध संजूची कामगिरी प्रभावी राहिली आहे. पाच टी-२० सामन्यांत त्याने दोन शतकांसह २५३ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १९० पेक्षा जास्त आहे. त्यामुळे सुपर-८च्या महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसन ‘गेमचेंजर’ ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







