गेल्या वर्षी श्रेयस अय्यरला भारतीय कसोटी संघातून तसेच केंद्रीय करारातून वगळण्यात आले. तेव्हापासून अय्यरने मागे वळून पाहिले नाही. २०२४ मध्ये केकेआरने त्याच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद जिंकले. त्याआधी तो रणजी ट्रॉफी जिंकणाऱ्या मुंबई संघाचा भाग होता.
इराणी कप आणि सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी जिंकली. आयपीएल २०२५ मध्ये अय्यरच्या नेतृत्वाखाली पंजाब किंग्ज अंतिम फेरीत पोहोचला. यानंतरही अय्यरला इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये स्थान मिळाले नव्हते. श्रेयस अय्यर सध्या भारतासाठी केवळ एकदिवसीय सामने खेळतो. आता तो भारतीय टी-२० संघात तसेच कसोटी संघात परतणार असल्याची चर्चा भारतीय क्रिकेट वर्तुळात आहे.
भारतीयनिवड समिती या महिन्यात आशिया कप तसेच वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करणार आहे. आशिया कप ९ सप्टेंबरपासून टी-२० स्वरूपात खेळला जाईल. तर वेस्ट इंडिजविरुद्धची कसोटी मालिका २ ऑक्टोबरपासून अहमदाबादमध्ये रंगणार आहे.
अय्यरने २०२३ मध्ये त्याचा शेवटचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. दुलीप ट्रॉफीसाठी पश्चिम विभागाच्या संघात अय्यरची निवड झाली आहे. ही स्पर्धा २८ ऑगस्टपासून बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स येथे खेळवली जाईल. पश्चिम विभाग गतविजेता असल्याने थेट उपांत्य फेरीत खेळेल.
उपांत्य फेरीच्या लढती ४ सप्टेंबरपासून सुरू होतील. गेल्या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या घरच्या मालिकेत पाठीच्या दुखापती आणि खराब फॉर्ममुळे अय्यरला कसोटी संघातून वगळण्यात आले होते. गेल्या रणजी ट्रॉफी हंगामात मुंबईकडून खेळताना अय्यरने पाच सामन्यांमध्ये ६८.५७ च्या सरासरीने ४८० धावा केल्या होत्या आणि दोन शतकेही झळकावली होती.







