टी20 वर्ल्ड कप २०२६ च्या सुपर-८ फेरीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला ७६ धावांनी दारुण पराभव पत्करावा लागला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यानंतर टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः अक्षर पटेलला संघाबाहेर ठेवण्याच्या निर्णयावर माजी खेळाडूंनी उघड नाराजी व्यक्त केली आहे.
अश्विनचा थेट सवाल – “त्याने तुमच्यासाठी काय केलं, ते विसरू नका!”
रविचंद्रन अश्विनने आपल्या ‘ऐश की बात’ या यूट्यूब चॅनेलवर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली.
“आयपीएलमध्ये मॅचअप महत्त्वाचे असतात, पण आयसीसी स्पर्धेत वारंवार बदल करणं धोकादायक ठरू शकतं. अक्षर पटेल हा तुमचा महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने संघासाठी काय केलं, हे विसरू नका.”
अश्विनने २०२४ च्या टी20 वर्ल्ड कप फायनलची आठवण करून दिली, जिथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कठीण प्रसंगी अक्षरने विराट कोहलीसोबत भागीदारी करत भारताला १७० पार नेले होते.
“त्या वेळी अक्षरचं योगदान तितकंच महत्त्वाचं होतं,” असेही तो म्हणाला.
त्याने फलंदाजी क्रमावरही प्रश्न उपस्थित केला.
“रिंकू सिंहला क्रमांक ८ वर पाठवणं योग्य नाही. आठ फलंदाज असूनही त्याचा योग्य वापर झाला नाही. दक्षिण आफ्रिकेने अधुरी तयारी कशी महागात पडते, हे दाखवून दिलं.”
अजिंक्य रहाणेही हैराण
अजिंक्य रहाणेनेही टीम मॅनेजमेंटच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केलं.
“अक्षर का खेळला नाही, हे समजत नाही. सुंदर चांगला खेळाडू आहे, पण अक्षर वेगवेगळ्या परिस्थितीत प्रभावी ठरला आहे. कधी कधी फार ‘स्मार्ट’ निवड उलट नुकसानकारक ठरते.”
रहाणेने स्पष्ट केलं की, डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध ऑफस्पिनर यशस्वी ठरेलच याची हमी नसते.
“अक्षरचा डावखुऱ्यांविरुद्ध चांगला रेकॉर्ड आहे. उपकर्णधार असूनही त्याला बाहेर ठेवणं योग्य नाही,” असे त्याचे मत.
टीम मॅनेजमेंटचा खुलासा
सहायक प्रशिक्षक रायन टेन डेशकाटे यांनी निर्णयामागची रणनीती स्पष्ट केली.
“दक्षिण आफ्रिकेच्या वरच्या फळीत अनेक डावखुरे फलंदाज आहेत – क्विंटन डी कॉक, रायन रिकेल्टन, डेविड मिलर. त्यामुळे पॉवरप्लेमध्ये ऑफस्पिन पर्याय अधिक प्रभावी ठरेल, असे आम्हाला वाटले. म्हणून वॉशिंग्टन सुंदरला संधी दिली.”
आकडे काय सांगतात?
-
पॉवरप्लेमध्ये सुंदर: ५७ डावांत २३ बळी
-
पॉवरप्लेमध्ये अक्षर: ६२ डावांत १४ बळी
-
मधल्या षटकांत अक्षर: ७९ डावांत ६३ बळी
-
मधल्या षटकांत सुंदर: ४८ डावांत २३ बळी
तथापि, या सामन्यात सुंदरचा प्रभाव दिसला नाही. त्याने २ षटकांत १७ धावा दिल्या, एकही बळी मिळवला नाही. फलंदाजीतही तो केवळ ११ धावा करू शकला.
सामना कसा फिरला?
दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत ७ बाद १८७ धावा केल्या.
भारताची फलंदाजी मात्र पूर्णपणे कोसळली आणि संपूर्ण संघ १११ धावांत गारद झाला. परिणामी ७६ धावांचा मोठा पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवानंतर भारताच्या उपांत्य फेरीच्या आशा धूसर झाल्या आहेत.
प्रश्न अजूनही कायम…
रणनीती की चूक?
‘मॅचअप’चा अति विचार की विश्वासू खेळाडूला डावलण्याची घाई?







