अफाट प्रतिभा, पण अपूर्ण स्वप्न — विनोद कांबळीची अधुरी कारकीर्द

अफाट प्रतिभा, पण अपूर्ण स्वप्न — विनोद कांबळीची अधुरी कारकीर्द

गुरू रमाकांत आचरेकर यांनी भारतीय क्रिकेटला अनेक मोठे खेळाडू दिले. त्यात सर्वात झळाळणारी दोन नावं म्हणजे सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी. सचिनने आपल्या अफाट प्रतिभेचा पूर्ण वापर केला आणि आपल्या कामगिरीमुळे ‘क्रिकेटचा देव’ म्हणून ओळख मिळवली. पण अनेक क्रिकेट तज्ज्ञांच्या मते, कांबळीची नैसर्गिक प्रतिभा सचिनपेक्षाही अधिक होती. मात्र, दुर्दैवाने तो आपल्या प्रतिभेशी न्याय करू शकला नाही आणि दमदार सुरुवात असलेला त्याचा कारकीर्दीचा प्रवास शेवटी निराशाजनक ठरला.

विनोद कांबळीचा जन्म १८ जानेवारी १९७२ रोजी मुंबईत झाला. त्याचा क्रिकेट प्रवास सचिनसोबतच सुरू झाला. लहानपणापासून भारतासाठी खेळण्याचं स्वप्न पाहणारा कांबळी पहिल्यांदा चर्चेत आला, तो शालेय क्रिकेटमुळे. शारदाश्रम विद्यामंदिरकडून खेळताना सचिन आणि कांबळीने मिळून ६६४ धावांची नाबाद भागीदारी केली होती. हा विक्रम आजही अबाधित आहे.

कांबळीची जबरदस्त टाइमिंग, बेधडक फटकेबाजी आणि आत्मविश्वासामुळे तो लवकरच देशांतर्गत क्रिकेटमध्ये नावारूपाला आला. त्यानंतर १९९३ मध्ये इंग्लंडविरुद्ध त्याने भारताकडून कसोटी पदार्पण केलं. दुसऱ्याच कसोटीत मुंबईत त्याने २२४ धावांची अफलातून खेळी केली. त्यानंतर दिल्लीत झिम्बाब्वेविरुद्ध २२७ धावा केल्या. या दोन खेळींच्या जोरावर तो सर्वात जलद १,००० कसोटी धावा करणारा फलंदाज ठरला. तेव्हा अनेकांना वाटू लागलं की हा भारताचा पुढचा महान फलंदाज आहे.

पण हीच सुरुवात पुढे टिकवण्यात कांबळी अपयशी ठरला. काळ जसजसा पुढे गेला, तसतशा त्याच्या मर्यादा समोर यायला लागल्या. परदेशी मैदानांवर वेगवान आणि उसळणाऱ्या गोलंदाजीसमोर तो अडखळू लागला. दुखापती, फिटनेसच्या समस्या आणि स्वभावाशी संबंधित प्रश्न यांचाही त्याच्या खेळावर परिणाम झाला. मैदानाबाहेरची जीवनशैली आणि वादही त्याच्या कारकीर्दीसाठी मारक ठरले.

हेही वाचा :

इंदौरमध्ये विराटचा विक्रमाचा डाव?

पीएमसीच्या पोर्टलवर नावांचा गोंधळ!

राज ठाकरेंचा फायदा इतरांना, पण मनसेची झोळी रिकामीच

महानगरपालिका निवडणुकीतील अपयशावर राज ठाकरे काय म्हणाले?

शेवटी सातत्य नसलेल्या कामगिरीमुळे कांबळीला संघातून बाहेर करण्यात आलं आणि अफाट शक्यता असलेला करिअर अपेक्षेआधीच संपुष्टात आला.

आकडेवारी पाहिली, तर १९९३ ते १९९५ दरम्यान कांबळीने १७ कसोटी सामन्यांत ४ शतकांसह १,०८४ धावा केल्या. तर १९९१ ते २००० या काळात १०४ वनडेमध्ये २ शतके, १४ अर्धशतकांसह २,४७७ धावा त्याच्या नावावर आहेत.

आज मात्र विनोद कांबळी आर्थिक आणि शारीरिक अडचणींशी झुंज देताना दिसतो. क्रिकेटमधील त्याची कहाणी ही प्रतिभा असूनही योग्य दिशा आणि सातत्य नसेल, तर काय होऊ शकतं याचं जिवंत उदाहरण मानली जाते.

Exit mobile version