टी-२० वर्ल्डकप २०२६ मधून बांगलादेशने माघार का घेतली, याचा आता सखोल तपास होणार आहे. या निर्णयामुळे आधीच चर्चेत असलेल्या बांगलादेश क्रिकेट बोर्डावर (आरसीबी) नव्या सरकारने चौकशीचे आदेश दिले आहेत.
युवा व क्रीडा राज्यमंत्री अमीनुल इस्लाम यांनी जाहीर केले की, ईदनंतर विशेष चौकशी समिती स्थापन केली जाईल. ही समिती भारत आणि श्रीलंकेत होणाऱ्या या स्पर्धेतून बाहेर पडण्यामागे क्रीडा राजनयातील अपयश कारणीभूत होते का, याचा तपास करणार आहे.
“आपण वर्ल्डकपमध्ये का सहभागी होऊ शकलो नाही, आणि आपल्या क्रीडा राजनयात नेमकी कुठे चूक झाली, हे शोधणे गरजेचे आहे,” असे अमीनुल इस्लाम यांनी स्पष्ट केले.
सरकारच्या मते, हा प्रश्न केवळ एका स्पर्धेपुरता मर्यादित नाही. यामुळे बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संबंधांमधील आणि निर्णय प्रक्रियेमधील त्रुटीही समोर येऊ शकतात.
दरम्यान, आरसीबीच्या अलीकडील निवडणुकांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांशीही या प्रकरणाचा संबंध जोडला जात आहे. क्लब आणि जिल्हास्तरावरून अनेक तक्रारी दाखल झाल्या असून, त्यांची चौकशी सुरू आहे.
विशेष म्हणजे, बीसीबीने नुकतीच मंत्रालयाकडे आधीची चौकशी बंद करण्याची विनंती केली होती. मात्र त्यानंतर लगेचच नव्या चौकशीची घोषणा झाल्याने सरकार आणि बोर्ड यांच्यातील तणाव उघड झाला आहे.
या वादाची सुरुवात तेव्हा झाली, जेव्हा बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सुरक्षेचे कारण देत टी-२० वर्ल्डकपमधून माघार घेतली. आयसीसीसोबत अनेक वेळा चर्चा होऊनही बोर्ड आपल्या निर्णयावर ठाम राहिला. अखेर बांगलादेशला स्पर्धेबाहेर करण्यात आले आणि त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी देण्यात आली.
आता या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, याचे निष्कर्ष बांगलादेश क्रिकेटच्या प्रतिमेवर मोठा परिणाम करू शकतात.







