तरुणांनी नाकर्त्या किंवा शोषक सत्तेच्या विरोधात केलेल्या उठावाला जर जेन झी क्रांती म्हणत असतील तर गिलगिट बाल्टीस्तानमध्ये जे काही चालले आहे, त्याला मीडिया जेन झी क्रांतिचा टॅग का लावत नाही? बांगलादेश, श्रीलंका आणि नेपाळमधील तथाकथिक जेन झी क्रांतीमुळे भारावलेला, या क्रांतिचा गवगवा करणारा, भारतातील विरोधी पक्ष गिलगिट बाल्टीस्तानच्या क्रांतीकडे डोळेझाक का करतो आहे? पाकिस्तान रेंजर्सच्या गोळ्या छाताडावर झेलून कित्येक तरुणांनी मरण पत्करल्यानंतरही भारतातील जेन झी क्रांतिचे समर्थक मौन का? पाकिस्तानच्या अवैध कब्जात असलेला गिलगिट-बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे. इथली जनता आता पाकिस्तानच्या कचाट्यातून निसटू पाहते आहे. भारतात सामील होण्याची इच्छा त्यांनी वारंवार व्यक्त केलेली आहे. त्यामुळे खरे तर देशातील प्रत्येक राजकीय पक्षाने या आंदोलनाचे समर्थन करायला हवे. तसे चित्र मात्र दिसत नाही. देशातील अनेक नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वेळोवेळी आव्हान दिले आहे, हिंमत असेल तर पाक व्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन दाखवा. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांचे नाव घेता येईल. आता तिथली जनताच म्हणते आहे, आम्हाला भारताची मदत हवी आहे, आम्हाला भारतात यायचे आहे. परंतु विरोधी बाकावर बसलेला एकही राजकीय पक्ष त्यांची दखल घेताना दिसत नाही. किंबहुना या आंदोलनाला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत.
