पश्चिम बंगालमधील पुरुलिया जिल्ह्यातील एका कुटुंबाची तब्बल १२ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या ‘जनता दरबार’मध्ये आपली व्यथा मांडल्यानंतर अवघ्या १२ दिवसांत या कुटुंबाच्या घरात प्रथमच वीज पोहोचली. या घटनेची राज्यभर चर्चा होत आहे.
पुरुलिया जिल्ह्यातील कल्पना बौरी यांचे कुटुंब गेली १२ वर्षे वीजेअभावी अंधारात जीवन जगत होते. वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवूनही त्यांच्या घराला वीज जोडणी मिळत नव्हती. त्यामुळे कुटुंबाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः मुलांच्या शिक्षणावर त्याचा गंभीर परिणाम होत होता. रात्री अभ्यास करण्यासाठी दिवे किंवा कंदिलांवर अवलंबून राहावे लागत असल्याने शिक्षणात मोठे अडथळे निर्माण झाले होते.
कृष्णा बौरी यांनी सांगितले की की, त्यांनी गेल्या बारा वर्षांत अनेक वेळा अर्ज सादर केले होते आणि मागील सरकारच्या कार्यकाळातही अधिकाऱ्यांकडे वारंवार संपर्क साधला होता. तथापि, त्यांच्या अथक प्रयत्नांनंतरही हा प्रश्न सुटला नाही आणि त्यांचे कुटुंब विजेविनाच राहिले. तोडगा काढण्याचा निर्धार करून, कृष्णा बौरी यांच्या पत्नी कल्पना बौरी, आपल्या मुलीसह, १३ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात सहभागी होण्यासाठी कोलकाता येथील सॉल्ट लेक येथे गेल्या. त्यांनी अनुक्रमांक ३४ म्हणून आपली तक्रार नोंदवली. त्यांना मुख्यमंत्र्यांना वैयक्तिकरित्या भेटण्याची संधी मिळाली नाही, तरी तक्रार सुनावणीसाठी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार नोंदवून घेतली आणि हे प्रकरण प्राधान्याने हाताळले जाईल असे आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर केवळ १२ दिवसांत वीज वितरण विभागाने आवश्यक काम पूर्ण करून त्यांच्या घराला वीज जोडणी दिली. अनेक वर्षांनंतर घरात बल्ब पेटल्याचा क्षण बौरी कुटुंबासाठी अत्यंत भावनिक ठरला. कुटुंबीयांनी प्रशासन आणि राज्य सरकारचे आभार मानले.
हे ही वाचा:
मी मुंबईतच आहे, महाराष्ट्रातच राहणार!
पुण्यात ९२ हजार कोटींची घरे विक्रीविना
गोव्यात औपचारिक दैनिक वेतनात २.५ टक्क्यांची वाढ
ग्लासगो राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला आणखी एक पदक
कल्पना बौरी यांनी सांगितले की, अनेक वर्षे विविध कार्यालयांमध्ये फेऱ्या मारूनही प्रश्न सुटला नव्हता. मात्र जनता दरबारात तक्रार केल्यानंतर प्रशासनाने तत्परतेने कारवाई केली आणि त्यांच्या घरातील अंधार कायमचा दूर झाला. आता त्यांच्या मुलांना रात्रीच्या वेळीही व्यवस्थित अभ्यास करता येणार असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. या घटनेमुळे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या जनता दरबार उपक्रमाची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली असून, नागरिकांच्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही करण्याच्या यंत्रणेचे हे उदाहरण मानले जात आहे.
