चीनला प्रत्युत्तर; अरुणाचलमधील २७ ठिकाणांना भारताने दिली अधिकृत ओळख

सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशावर नोंद

चीनला प्रत्युत्तर; अरुणाचलमधील २७ ठिकाणांना भारताने दिली अधिकृत ओळख

अरुणाचल प्रदेशावर दावा करण्यासाठी चीनकडून सातत्याने सुरू असलेल्या ‘नावबदलाच्या खेळी’ला भारताने आता अधिकृत नकाशाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आहे. भारताने अरुणाचल प्रदेशातील २७ ठिकाणे आणि भौगोलिक वैशिष्ट्यांची प्रमाणित भारतीय नावे सर्व्हे ऑफ इंडियाच्या अधिकृत नकाशावर नोंदवली आहेत. या निर्णयामुळे सीमावर्ती भागातील महत्त्वाच्या ठिकाणांची अधिकृत ओळख स्पष्ट होण्याबरोबरच त्यांचे भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व अधोरेखित झाले आहे.

केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, या ठिकाणांची अधिकृत नकाशावर नोंद करण्यामागचा उद्देश त्यांची अचूक ओळख निश्चित करणे आणि सर्वसामान्यांमध्ये या ठिकाणांच्या भौगोलिक व ऐतिहासिक महत्त्वाबाबत जागरूकता वाढवणे हा आहे. ही प्रक्रिया अरुणाचल प्रदेश सरकारशी सल्लामसलत करून करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असल्याची भूमिका नवी दिल्लीने सातत्याने मांडली आहे. मात्र चीन अरुणाचल प्रदेशला ‘झांगनान’ या नावाने संबोधतो आणि या संपूर्ण राज्यावर दावा करतो.

चीनने या दाव्याला बळ देण्यासाठी अरुणाचल प्रदेशातील विविध ठिकाणांची चिनी नावे जाहीर करण्याची पद्धत अवलंबली आहे. बीजिंगने २०१७ मध्ये अशा प्रकारची पहिली यादी जाहीर करत सहा ठिकाणांना चिनी नावे दिली. त्यानंतर २०२१ मध्ये १५ आणि २०२३ मध्ये आणखी ११ ठिकाणांची नावे जाहीर केली. भारताने चीनच्या या सर्व प्रयत्नांना सातत्याने फेटाळले आहे. नवी दिल्लीने चीनच्या या नामकरणाला ‘निरर्थक आणि हास्यास्पद’ स्वरूपाचा प्रयत्न ठरवले असून, केवळ नावे बदलल्याने जमिनीवरील वास्तव बदलत नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारताच्या भूमिकेनुसार अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि राहणार आहे.

हे ही वाचा:

नाक खुपसू नका! ‘एफसीआरए’ भारताचा अंतर्गत विषय!!

भारताकडे येणाऱ्या ६२ जहाजांनी सुरक्षितपणे ओलांडली होर्मुझ

परकीय निधी विनियमन कायद्याने ख्रिश्चनांचा छळ, ही थाप!

मेटाचे अल्गोरिदम आता सरकारच्या रडारवर

२७ ठिकाणे नकाशावर का महत्त्वाची?

भारताने अधिकृत नकाशावर समाविष्ट केलेली ही २७ ठिकाणे केवळ भौगोलिक स्थळे नाहीत. त्यापैकी अनेक ठिकाणांचा भारत-चीन सीमावाद, लष्करी संघर्ष आणि सीमावर्ती सुरक्षेशी थेट संबंध आहे. या यादीत पर्वतीय खिंडी, गावे, उंचावरील तलाव तसेच युद्धस्मारकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ असल्याने त्यांचे सामरिक महत्त्वही मोठे आहे.

Exit mobile version