भोजशाळेत आता नमाज नाही…पोलिस अधिकारी सचिन शर्मांची सक्त ताकीद

भोजशाळेत आता नमाज नाही…पोलिस अधिकारी सचिन शर्मांची सक्त ताकीद

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने धार जिल्ह्यातील भोजशाळा संकुलाला मंदिर घोषित केल्यानंतर अवघ्या आठवड्यातच प्रशासनाने त्या परिसरातील सुरक्षा मोठ्या प्रमाणात वाढवली आहे. गेल्या शुक्रवारपर्यंत या संकुलात नमाज अदा करण्यास परवानगी होती. अनेक दशकांपासून सुरू असलेल्या “मशीद की मंदिर” वादावर निर्णय देताना न्यायालयाने या संकुलाला मंदिर घोषित केले आणि हिंदूंना पूजा करण्याचा मार्ग मोकळा केला.

आता या निर्णयानंतरचा पहिला शुक्रवार असल्याने जिल्हा प्रशासन कोणतीही जोखीम घेण्याच्या मनःस्थितीत नाही. काही गटांकडून संकुलात जुम्म्याची नमाज अदा करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर धारचे पोलिस अधीक्षक सचिन शर्मा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्या व्हिडिओमध्ये एसपी शर्मा संभाव्य गोंधळ घालणाऱ्यांना कडक इशारा देताना दिसत आहेत.

जीपवर उभे राहून शर्मा शांतता भंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना चेतावणी देताना दिसतात. “ज्यांच्यात हिंमत आहे किंवा ज्यांना वाटते की ते कायद्याला आव्हान देऊ शकतात, त्यांनी उद्या (शुक्रवारी) प्रयत्न करून पाहावा. आम्ही पूर्ण तयारीत आहोत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे शर्मा व्हायरल व्हिडिओमध्ये म्हणताना दिसतात.

हे ही वाचा:

गाई, म्हशींची कत्तल इस्लामच्या धार्मिक सणांचा भाग नाही…याचिका फेटाळल्या

इराण पुन्हा लष्करी ताकद उभी करतंय; ड्रोन उत्पादनाला वेग

मोदींच्या ५ देशांच्या दौऱ्याने भारताला आर्थिक बूस्ट

अमेरिकेच्या ताब्यात असलेल्या जहाजावरील २० इराणी खलाशी परतले मायदेशी

ते पुढे म्हणाले की कोणत्याही परिस्थितीत कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवली जाईल आणि सोशल मीडियावर अफवा किंवा न्यायालयाच्या आदेशाचे विकृत स्वरूप पसरवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. भाषणाच्या शेवटी पोलिस अधिकारी “भारत माता की जय” अशी घोषणा देताना दिसतात आणि उपस्थित लोकही त्याला प्रतिसाद देत जयघोष करतात.

२००३ पासून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) भोजशाळा संकुलात मंगळवारी पूजा आणि शुक्रवारी नमाज अदा करण्यास परवानगी दिली होती. हिंदू संघटनांनी एएसआयच्या या आदेशाला आव्हान दिले होते आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर १५ मे रोजी मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदौर खंडपीठाने हिंदूंच्या बाजूने निर्णय देत वादग्रस्त संकुल मंदिर असल्याचे घोषित केले आणि हिंदूंना पूजा करण्यास परवानगी दिली.

दरम्यान, मुस्लिम पक्षाने गुरुवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिले आहे. त्या आदेशात धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा संकुल हे देवी सरस्वतीला समर्पित मंदिर असल्याचे म्हटले होते.

या प्रकरणावरील निर्णयात उच्च न्यायालयाने असेही म्हटले होते की मुस्लिम समुदायाने मशिदीच्या बांधकामासाठी जिल्ह्यात स्वतंत्र जमीन वाटपासाठी मध्य प्रदेश सरकारकडे अर्ज करू शकतो.

Exit mobile version