महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या वाशी येथील निर्यात सुविधा केंद्रावरून आंब्याच्या निर्यातीत वाढ झाली आहे. मागील वर्षांच्या तुलनेत सरासरी दीडपटीने वाढ होऊन २३ जून अखेर ९७४.८९ टन आंब्यांची निर्यात झाली आहे. सर्वाधिक ८०६ टन इतकी निर्यात अमेरिकेला झाली आहे.
पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या हंगामात क्षकिरण प्रक्रिया करून जपानला ४१.६४ टन, न्यूझीलंडला ८६.२६ टन, दक्षिण कोरियाला ३.८८ टन, मलेशियाला ०.४६ टन, ऑस्ट्रेलियाला २७.२९ टन, युरोपीयन देशांना ८.६० टन आणि अमेरिकेला सर्वाधिक ८०६ टन इतकी निर्यात झाली आहे. मागील वर्षी ५७६ टन निर्यात झाली होती, यंदा २३ जून अखेर ९७४.८९ इतकी निर्यात झाली आहे.
देशातून हापूस, केशर, बैगनपल्ली (बदामी) आंब्याची निर्यात होते. यंदा हापूस, केशर, बदामी आंबे ८ एप्रिल रोजी जपानला आणि ११ एप्रिल रोजी अमेरिकेला पाठविण्यात आले. अमेरिका आणि दक्षिण कोरियाला होणारी निर्यात आता बंद झाली आहे. या दोन्ही देशांचे निरीक्षक पथक मायदेशी रवाना झाले आहे. वाशी येथून दक्षिण कोरियाला यंदा प्रथमच आंब्याची निर्यात करण्यात आली आहे. आता राज्यातून जुन्नर परिसरात उत्पादित होणाऱ्या आंब्यांची निर्यात सुरू आहे. त्या शिवाय दक्षिण आणि उत्तर भारतात उत्पादित होणाऱ्या आंब्याची निर्यात सुरू आहे.
हे ही वाचा:
पालिकेच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी अनिल परबांसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
मणिपूरमध्ये सैनिकांच्या कामात महिलांचा अडथळा
१५ ऑक्टोबरला भारत पाकिस्तान भिडणार
अनधिकृत शाखा तोडल्यामुळे ठाकरे गटाचा थयथयाट
बदलत्या हवामानाच्या फटक्यामुळे कोकणात हापूस आंब्याच्या उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यामुळे आंब्यांची निर्यात कमी होणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यामुळे निर्यातीवर परिणाम होण्याची शक्यता होती. मात्र, हापूसची कसर हापूस, केशर, बैगनपल्ली (बदामी) आंब्यांनी भरुन काढली. मागील वर्षीच्या तुलनेत सरासरी दीडपट वाढ होऊन यंदा २३ जून अखेर ९७४.८९ टन आंब्याची निर्यात झाली आहे.
दक्षिण आणि उत्तर भारतातील आंब्याची निर्यात अजूनही सुरूच आहे, त्यामुळे निर्यातीच्या आकड्यांमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. “पणन मंडळाच्या वतीने वाशी येथे अत्याधुनिक निर्यात केंद्राची सुविधा निर्माण करण्यात आली असून देशभरातील आंब्याची येथून निर्यात होते. वाशी बाजार समितीतील व्यापाऱ्यांकडे आलेल्या आंब्यातून दर्जेदार आंबे निवडून निर्यात करत असल्यामुळे निर्यात सतत वाढत आहे,” अशीही माहिती पणन मंडळाचे उपसरव्यवस्थापक मिलिंद जोशी यांनी दिली.







