दिल्लीच्या मुख्यमंत्री यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांचा पहिला फोटो समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिल्लीतील सर्व सात लोकसभा भाजप खासदारांची बैठक घेतली आहे. या भेटीचे फोटो समोर आले आहेत. काल (२० ऑगस्ट) जनसुनावणीदरम्यान मुख्यमंत्र्यांवर हल्ला झाला होता. या घटनेनंतर आरोपीला ताब्यात घेण्यात आले. कोर्टाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आणि पोलीस अधिक तपास करत आहेत.
मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेतल्यानंतर भाजप खासदार रामवीर सिंह बिधुरी म्हणाले, “मुख्यमंत्री आता पूर्णपणे बऱ्या आहेत आणि त्यांचा आत्मविश्वासही मजबूत आहे. त्यांना दिल्लीतील जनतेची चिंता आहे… उद्यापासून त्यांचे नियमित कामकाज सुरू होईल… मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची वाढती लोकप्रियताच त्यांच्या वर झालेल्या हल्ल्यामागचे एकमेव कारण आहे.”
भाजप खासदार योगेंद्र चंदोलिया म्हणाले, “मुख्यमंत्री आता स्थिर आणि ठीक आहेत. काल घडलेली घटना अत्यंत निषेधार्ह आहे. यावेळी भाजप खासदार कमलजीत सेहरावत देखील होत्या. भेटीनंतर त्या म्हणाल्या, “मुख्यमंत्री पूर्णपणे ठणठणीत आहेत. या घटनेचा त्यांच्या मनोबलावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्या लवकरच जनतेसमोर दिसतील. हे सुरक्षा यंत्रणेचं अपयश नव्हतं, मात्र सामान्य नागरिकातून अशा प्रकारची कृती होईल, अशी अपेक्षा नव्हती, पोलीस आपलं काम करत आहेत.”
तर भाजप खासदार मनोज तिवारी म्हणाले, “मुख्यमंत्र्यांच्या मनोबलावर याचा कोणताही परिणाम झालेला नाही. जनसुनावणी नियोजित वेळापत्रकानुसार सुरू राहील. त्या पुन्हा पुढच्या बुधवारपासून लोकांशी भेटतील. त्या उद्यापासून पुन्हा कामावर रुजू होतील. मुख्यमंत्री जखमी झाल्या असल्या तरी आता त्या स्थिर आणि ठणठणीत आहेत.”
हे ही वाचा :
उपराष्ट्रपतीपदासाठी बी. सुदर्शन रेड्डी यांचे नामांकन
‘भारतासोबतचे संबंध तोडणे हे धोरणात्मक आपत्ती ठरेल’
भारतात अटक केलेली एफबीआयची मोस्ट वॉन्टेड फरारी ‘सिंडी सिंग’ कोण आहे?
मीठी नदी घोटाळा प्रकरण : मुंबई पोलिसांच्या ईओडब्ल्यूकडून ठेकेदार शेरसिंह राठोड याला अटक
मुख्यमंत्र्याच्या भेटीमध्ये भाजप खासदार बंसुरी स्वराजही होत्या. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर त्या म्हणाल्या, “दिल्लीचे सर्व सात खासदार मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या स्वास्थ्याची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. मी दिल्लीतील जनतेला खात्री देऊ इच्छिते की चिंता करण्यास काहीही कारण नाही. रेखा गुप्ता या धैर्यवान आहेत आणि त्यांचे मनोबल अजूनही उच्च आहे. जसं त्या नेहमी जनतेमध्ये राहतात, तसंच पुढेही सर्वांना भेटत राहतील. आरोपीला माफ केलं जाणार नाही.”







