
-
प्रशांत कारुळकर
दुसऱ्या महायुद्धापासून आजतागायत भारतीय लष्कराचा दबदबा जगाने पाहिला आहे. लष्करी शक्तीच्या जागतिक क्रमवारीत भारतीय लष्कर चौथ्या क्रमांकावर आहे. भारतीय लष्करात अलीकडेच काही महत्त्वपूर्ण फेरबदल झाले आहेत. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची ‘व्हाइस चीफ ऑफ आर्मी स्टाफ’ (VCOAS) या अत्यंत जबाबदारीच्या पदावर नियुक्ती जाहीर झाली आहे. त्यांना भेटण्याची सुसंधी मला मिळाली आणि त्यांच्याशी संवाद साधता आला, याचा मला वैयक्तिकरित्या सार्थ अभिमान वाटतो. एका सुयोग्य अधिकाऱ्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवल्याबद्दल संबंधित यंत्रणेचे अभिनंदन करण्याचा मोह मला आवरता येत नाही.
१ एप्रिल २०२६ पासून त्यांनी या पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. कॉर्पोरेट जगात आपण ज्याला ‘ऑपरेशन्स एक्सलन्स’ आणि ‘स्ट्रॅटेजिक थिंकिंग’ म्हणतो, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांची कारकीर्द. जयपूर येथील भेटीत मला हे प्रकर्षाने जाणवले. यावेळी माझा मुलगा विवान माझ्यासोबत होता. त्याने लिहिलेल्या पुस्तकांबाबत जनरल सेठ यांनी अत्यंत आपुलकीने जाणून घेतले. ‘एस्ट्रॉईड’ विषयावर विवानने केलेल्या कामाचे त्यांनी केवळ शब्दांत कौतुक केले नाही, तर लष्करातर्फे दिले जाणारे ‘सर्टिफिकेट ऑफ एप्रिसिएशन’ देऊन त्याचा गौरव केला. त्यांच्या या संवेदनशील प्रतिसादामुळे मी खरोखरच भारावून गेलो.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ हे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (NDA) माजी विद्यार्थी असून, त्यांनी आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. विषयाचे सखोल तांत्रिक ज्ञान आणि रणांगणावरील प्रत्यक्ष अनुभव यांचा संगम त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवतो.
जनरल सेठ यांचा लष्करी प्रवास देदीप्यमान आहे. त्यांच्या अतुलनीय सेवेसाठी त्यांना PVSM, UYSM आणि AVSM यांसारख्या उच्च श्रेणीतील लष्करी पदकांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज’मध्ये त्यांना ‘बेस्ट ऑल राउंड स्टुडंट’ आणि ‘सिल्व्हर सेंच्युरीयन’ पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. वाळवंटी प्रदेशातील आर्मर्ड रेजिमेंटपासून ते जम्मू-काश्मीरमधील काऊंटर इन्सर्जन्सी फोर्सपर्यंत, त्यांनी विविध भौगोलिक आणि आव्हानात्मक परिस्थितींत नेतृत्वाची धुरा सांभाळली आहे.
१९९५-९६ दरम्यान अंगोलामध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या शांतता मोहिमेत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. ज्याचे नाणे खणखणीत असते, त्याला देशाच्या सीमांची मर्यादा नसते, हेच त्यांनी सिद्ध केले आहे.
‘व्हाइस चीफ’ म्हणून त्यांच्यावर लष्कराच्या आधुनिकीकरणाची मोठी जबाबदारी असेल. कॉर्पोरेट भाषेत सांगायचे तर, ‘बजेट ऑप्टिमायझेशन’ आणि ‘फ्युचर-रेडी’ इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यात त्यांची भूमिका कळीची ठरेल. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात, जलद आणि अचूक निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. त्यामुळे भारतीय लष्कराला अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचे कार्य ते करतील, यात शंका नाही. वरिष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन्ही स्तरांवरील सहकाऱ्यांशी त्यांचा समन्वय उत्तम आहे. सर्वांना सोबत घेऊन ध्येयाकडे वाटचाल करण्याचे कौशल्य त्यांच्यात उपजत आहे.
“आपल्या युनिटचा सन्मान, अभिमान आणि गौरव नेहमी सर्वोच्च ठेवा. कनिष्ठांची काळजी घ्या, वरिष्ठांचा आदर करा आणि भारतीय लष्कराच्या महान परंपरांचे पालन करत नेहमी आत्मविश्वासाने व निष्ठेने देशाचे प्रतिनिधित्व करा.”
जनरल सेठ यांनी व्यक्त केलेली ही भावना त्यांच्या समृद्ध व्यक्तिमत्त्वाची झलक दर्शवते. भारतीय लष्कराची ताकद केवळ शस्त्रास्त्रांत नसून अनुभवी आणि धोरणी नेतृत्वात आहे. लेफ्टनंट जनरल धीरज सेठ ही ताकद निश्चितपणे वृद्धिंगत करतील. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय लष्कराची ‘कॉम्बॅट रेडीनेस’ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अधिक प्रभावी होईल, असा मला ठाम विश्वास आहे.
लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांचे या नवीन जबाबदारीबद्दल हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस उत्कट शुभेच्छा! त्यांच्या हातून मातृभूमीची अशीच सेवा घडत राहो, हीच सदिच्छा.
वंदे मातरम्!







