पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गडचिरोली प्रशासनाचा दिलासा — दिल्लीच्या परिक्षेसाठी रवाना

पुरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना गडचिरोली प्रशासनाचा दिलासा — दिल्लीच्या परिक्षेसाठी रवाना

भामरागड तालुक्यातील पर्लकोटा नदीच्या पुरामुळे मागील चार दिवसांपासून अडकून पडलेल्या चार विद्यार्थ्यांना अखेर प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रयत्नांमुळे सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. हे विद्यार्थी दिल्ली येथे दिनांक 23 ऑगस्ट रोजी होणाऱ्या केंद्र सरकारच्या DSSSB विभागाच्या परीक्षेसाठी जाणार होते.

विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे नदीपार

पुराच्या पाण्यामुळे भामरागड शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना आज विशेष मोहिम राबवून SDRF टीमच्या मदतीने बोटीद्वारे पर्लकोटा नदी पार करून हेमलकसा येथे पोहोचविण्यात आले. यानंतर त्यांना पुढे दिल्लीच्या प्रवासासाठी रवाना करण्यात आले.

जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचे महत्त्व लक्षात घेऊन तहसील प्रशासनाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार महसूल प्रशासन, नगरपंचायत भामरागड तसेच एचडीएफ टीमने समन्वय साधून ही मोहिम यशस्वी केली.

Exit mobile version