अखाती प्रदेशात सुरू असलेल्या संघर्षामुळे भारताच्या ऑटोमोबाईल उद्योगाला येत्या काही आठवड्यांत पुरवठ्याशी संबंधित अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र, सध्या तरी याचा थेट परिणाम उत्पादन कारखान्यांवर झालेला नाही. उद्योगातील तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती अशीच कायम राहिल्यास पुढील ४ ते ६ आठवड्यांत याचे परिणाम दिसू लागतील.
उद्योगातील अधिकाऱ्यांच्या मते, सर्वात मोठी चिंता गॅस पुरवठ्याबाबत आहे, कारण अनेक उत्पादन प्रक्रियांमध्ये गॅसचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कमर्शियल एलपीजी आणि इतर औद्योगिक वायू पेंट शॉप, कास्टिंग युनिट आणि फोर्जिंग प्रक्रियांसाठी अत्यावश्यक असतात. या पुरवठ्यात अडथळे आले तर कच्च्या मालाचा खर्च वाढू शकतो.
अहवालानुसार, ऑटो क्षेत्राशी संबंधित अनेक पुरवठादारांनी मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे आधीच विलंब होत असल्याची माहिती दिली आहे. विशेषतः कतारमधून होणारा गॅस पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे, कारण इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांमुळे उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्या कंपन्यांकडे ४ ते ६ आठवड्यांसाठी पुरेसा घटक (कंपोनेंट) साठा उपलब्ध आहे, त्यामुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, हा संकटाचा कालावधी दोन महिन्यांपेक्षा जास्त वाढल्यास खरी अडचण सुरू होऊ शकते, विशेषतः ज्या प्रक्रियांमध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जा लागते.
गॅसची कमतरता आणि सागरी वाहतुकीतील अडथळे वाढल्यास उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि, महिंद्रा अँड महिंद्रा, मारुती सुजुकी, टाटा मोटर्स आणि किआ इंडिया यांसारख्या मोठ्या वाहन कंपन्यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या त्यांच्या उत्पादनावर कोणताही परिणाम झालेला नाही. त्यांच्या मते, पुरवठा साखळी (सप्लाय चेन) अद्याप स्थिर आहे, मात्र परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. कंपन्या त्यांच्या पुरवठादारांशी सतत संपर्कात आहेत, विशेषतः आयात किंवा गॅसवर जास्त अवलंबून असलेल्या पुरवठादारांशी. उद्योगातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की परिस्थिती वेगाने बदलत आहे आणि आवश्यकतेनुसार त्वरित निर्णय घेण्यासाठी कंपन्या सज्ज आहेत.
हे ही वाचा:
जगभरात दहशतवादात घट पण, पाकिस्तानमध्ये ६ % वाढ
कतारच्या ऊर्जा पायाभूत सुविधेवर इराणचा हल्ला; पुढील पाच वर्षे १७% LNG उत्पादन ठप्प
इराणमध्ये १९ वर्षीय चॅम्पियन कुस्तीपटूसह दोन आंदोलकांना सार्वजनिकरित्या दिली फाशी
दाऊदचा रत्नागिरीतील एक भूखंड विकला गेला १० लाखाला!
एका अहवालानुसार, विविध कंपन्यांची गॅसवरील अवलंबित्व वेगवेगळी आहे. मारुती सुजुकीच्या कारखान्यांमध्ये गॅसवरील अवलंबित्व सुमारे ७४ टक्के आहे, तर महिंद्रा अँड महिंद्रामध्ये ३८ टक्के, टाटा मोटर्समध्ये ३३ टक्के आणि हुंडई मोटरमध्ये ३१ टक्के आहे. याचा अर्थ, गॅस पुरवठा दीर्घकाळ बाधित राहिल्यास वेगवेगळ्या कंपन्यांवर त्याचा परिणामही वेगवेगळ्या प्रमाणात होईल. एकूणच, सध्या भारताचा ऑटो सेक्टर या संकटापासून सुरक्षित दिसत असला, तरी येणारे काही आठवडे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. यावरूनच हे स्पष्ट होईल की ही परिस्थिती मोठ्या पुरवठा संकटात परिवर्तित होते की नाही.







