राज्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला असून मुंबई, पुणे, रायगड, पालघर, सातारा आणि कोकणातील अनेक भागांना त्याचा मोठा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि मुंबई-पुणे रेल्वे मार्ग एकाच वेळी बंद झाल्याने राज्यातील सर्वात महत्त्वाचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्त्यांवर पाणी साचणे, नद्यांना पूर येणे आणि रेल्वे रुळांवर माती व दगड कोसळल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे.
सततच्या पावसामुळे मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील नव्याने उभारण्यात आलेल्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प परिसरात मोठे भूस्खलन झाले. स्लॅब कोसळून माती आणि पाण्याचा मोठा लोंढा महामार्गावर आल्याने प्रशासनाने संपूर्ण एक्स्प्रेसवे बंद करण्याचा निर्णय घेतला. याचवेळी अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोलनाक्याजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरही अनेक ठिकाणी दरडी कोसळल्याने हा मार्गही बंद करण्यात आला आहे. परिणामी दोन्ही दिशेतील वाहनांची अनेक किलोमीटरपर्यंत रांग लागली असून लोणावळा परिसरात तब्बल ३५ किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. प्रशासनाने पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांनी मुंबई-पुणे प्रवास टाळावा, असे स्पष्ट आवाहन केले आहे.
भोर घाटातील ठाकूरवाडी परिसरात रेल्वे रुळांवर मोठी दरड कोसळल्याने मुंबई-पुणे रेल्वे वाहतूकही पूर्णपणे ठप्प झाली आहे. रुळांवर दगड आणि माती आल्याने रेल्वे प्रशासनाने अनेक एक्स्प्रेस गाड्या रद्द केल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी परिस्थितीचा आढावा घेत रेल्वे अधिकाऱ्यांना युद्धपातळीवर काम करण्याचे निर्देश दिले आहेत. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या संयुक्त पथकांकडून रुळांवरील दरड हटवून सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई आणि उपनगरातही पावसाचा जोर कायम आहे. पालघर जिल्ह्यातील नालासोपारा स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने पश्चिम रेल्वेची उपनगरीय सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली. अनेक लोकल गाड्या उशिराने धावत असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेच्या सेवांवरही पावसाचा परिणाम झाला आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरही संकट
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. चिपळूणजवळील खवटी परिसरात हॉटेल अनुसया जवळ मोठी दरड महामार्गावर कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. पहाटेपासून यंत्रणांकडून दरड हटविण्याचे काम सुरू असले तरी सततचा पाऊस आणि अंधारामुळे कामात अडथळे येत आहेत. याशिवाय परशुराम घाटातही भूस्खलनाचा धोका निर्माण झाला असून डोंगरावरील माती आणि मोठे दगड रस्त्याकडे सरकू लागल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.
रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पेण-खोपोली मार्ग पाण्याखाली गेला असून सारसन ते इसांबा फाटा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. माणगाव-पाली, माणगाव-पुणे ताम्हिणी घाटमार्ग तसेच सुकेळी खिंडीजवळील मुंबई-गोवा महामार्गही वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पाताळगंगा, भोगावती आणि सावित्री या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
हे ही वाचा:
‘रेड अलर्ट’चा इम्पॅक्ट! मुंबईची गती मंदावली, लोकल-डबेवालेही थांबले
अंबादास दानवे जिंकले… पण महायुतीतून
बरे झाले, उद्धव ठाकरेंना श्रीरामाची आठवण झाली!
विशाखापट्टणम किनाऱ्याजवळ सहा मच्छीमार बेपत्ता
दक्षिण रायगडमधील महाड शहराला सावित्री नदीच्या पुराचा मोठा फटका बसला आहे. नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर शहरातील बाजारपेठांसह अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरले आहे. शेतीचेही मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याची तयारी सुरू केली आहे.
हवामान विभागाचा इशारा
भारतीय हवामान विभागाने मुंबई, पुणे, रायगड, पालघर आणि घाटमाथ्यावरील भागांसाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा कायम ठेवला आहे. पुढील २४ ते ४८ तासांमध्ये घाट परिसरात भूस्खलन, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ आणि सखल भागांत पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, मुंबई-पुणे तसेच मुंबई-गोवा मार्गावरील प्रवास पुढे ढकलावा आणि अधिकृत यंत्रणांकडून जारी होणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन केले आहे. सध्या राज्यातील अनेक भागांमध्ये बचाव आणि पुनर्स्थापना कार्य युद्धपातळीवर सुरू असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
