मान्सून दाखल होऊन देखील जून महिना कोरडा गेला, पण जुलैच्या पहिल्या ६ दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने जून महिन्यातील पावसाची कमतरता भरून काढली. या पावसानंतर आता मान्सूनने विश्रांती घेतलेली दिसतेय. पाऊस गायब झाल्याच्या बातम्या येत असतानाच आता एक मोठी अपडेट समोर येत आहे. देशभरात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, एकाच वेळी अनेक हवामान प्रणाली कार्यरत झाल्याने पुढील काही दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) १८ राज्यांसाठी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा जारी केला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. काही भागांमध्ये वादळी वारे, विजांचा कडकडाट आणि स्थानिक पातळीवर पूरस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात चांगला पाऊस पडू शकतो. त्यासोबतच बिहार, आसाम, मेघालय आणि पश्चिम बंगालच्या काही भागात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा:
डोक्यावरील केस कापले, गोमुत्र प्यायला दिले… विनायक राऊतांच्या सुनेची तक्रार
बुलेट ट्रेनच्या तीन नवीन मार्गांची घोषणा
विम्बल्डनची नवी राणी नोस्कोव्हाला आली आईची आठवण!
महाराष्ट्रात कसे असेल हवामान?
मान्सून सध्या बंगालच्या उपसागरापासून उत्तर भारतापर्यंत सक्रीय आहे. त्यासोबत एकाच वेळी पश्चिमी विक्षोभ आणि एकाचवेळी अनेक चक्रिवादळांची स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत देशातील बहुतांश भागात पावसाची स्थिती तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक राज्यांत वीज कोसळणे, वेगवान वारे वाहणे आणि पूरस्थिती निर्माण होणे अशा घटना घडू शकतात. महाराष्ट्रातील कोकण आणि गोव्यामध्ये सतत पाऊस सुरू राहू शकतो. गुजरात, सौराष्ट्र, कच्छ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्येही अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. तर दक्षिण भारतातील कर्नाटकचा किनारी भाग आणि केरळमध्ये चांगली पर्जन्यवृष्टी सुरू राहिल. तामिळनाडू, तेलंगाणा आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागात पाऊस पडेल. मात्र आंध्र प्रदेशच्या किनारी भागात काही ठिकाणी उष्णतेली लाट निर्माण होऊ शकते.
