भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील जानेवारी २०२४ मध्ये केपटाउन येथे झालेला कसोटी सामना क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आजही ताजा आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या नावावर असा एक लज्जास्पद विक्रम जमा झाला, जो आजही चर्चेत आहे.
केवळ दोन दिवसांत संपलेल्या या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.मात्र हा निर्णय त्यांच्याच संघावर उलटला.
पहिल्या डावात संपूर्ण दक्षिण आफ्रिकन संघ फक्त २३.२ षटकांत ५५ धावांवर गारद झाला. या डावात डेव्हिड बेडिंगहॅम (१२) आणि काईल व्हेरेन्ने (१५) यांशिवाय कोणताही फलंदाज दहाच्या पुढे गेला नाही. भारताच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत प्रतिस्पर्ध्यांना गारद केले.
मोहम्मद सिराजने केवळ १५ धावांत ६ बळी घेतले, तर जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. हा दक्षिण आफ्रिकेचा भारताविरुद्ध कसोटीतील सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम ठरला.
भारतीय संघाने प्रत्युत्तरात पहिल्या डावात ३४.५ षटकांत १५३ धावा केल्या. या डावात विराट कोहलीने सर्वाधिक ४६ धावा केल्या, तर कर्णधार रोहित शर्मा (३९) आणि शुभमन गिल (३६) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. मात्र या डावात भारताचे तब्बल सात फलंदाज खाते न उघडताच बाद झाले.
दक्षिण आफ्रिकेच्या बाजूने कगिसो रबाडा, लुंगी एन्गिडी आणि नांद्रे बर्गर यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. भारताला पहिल्या डावानंतर ९८ धावांची आघाडी मिळाली होती.
दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने एडन मार्करमच्या शतकी खेळीच्या (१०६) जोरावर लढा दिला, परंतु संपूर्ण संघ १७६ धावांवर बाद झाला. या वेळी जसप्रीत बुमराहने ६ बळी घेतले.
भारताला विजयासाठी ७९ धावांचे लक्ष्य मिळाले आणि भारतीय संघाने केवळ १२ षटकांत ७ गडी राखून हा विजय मिळवला.
पहिला सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला होता, पण भारताने दुसरा सामना जिंकून मालिका १-१ ने ड्रॉ केली.







