मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलावांपैकी ४ तलाव भरले

मोडक सागर तलाव ओसंडून वाहू लागला

मुंबईला पाणीपुरवठा करणारे ७ तलावांपैकी ४ तलाव भरले

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव आज (दिनांक २३ जुलै २०२६) रात्री २ वाजून ०७ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. या तलावाचा एक दरवाजा उघडण्यात आला असल्‍याची माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.

मागील काही दिवसांमध्ये तलावांच्या पाणलोट क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या दमदार पावसामुळे जलाशयांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे. आज रात्री ओसंडून वाहू लागलेल्या मोडक सागर तलावाची कमाल जलधारण क्षमता ही १२८९२.५ कोटी लीटर (१२८,९२५ दशलक्ष लीटर) आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात अर्थात सन २०२५ मध्‍ये दिनांक ९ जुलै रोजी, सन २०२४ मध्ये दिनांक २५ जुलै रोजी, सन २०२३ मध्ये २७ जुलै रोजी ‘मोडक सागर’ तलाव ओसंडून भरून वाहू लागला होता.

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. आज पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून १००९४३.२ कोटी लीटर (१०,०९,४३२ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा तलावांच्या कमाल जलधारण क्षमतेच्या अर्थात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत ६९.७४ टक्के इतका आहे.

हे ही वाचा:

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, ९३९ गावे पाण्याखाली

मुंबईच्या मोर्चात घुसलात तर फटकवून काढू, राज ठाकरेंचा इशारा

कंगाल पाकिस्तानची अमेरिकेकडे भीख!

आंदोलकांची दरोडेखोरी! पोलीसांचे ओळखपत्र अन् सोन्याची साखळी लांबवली

ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यात वैतरणा नदीवर उभारलेला मोडक सागर प्रकल्प मुंबई महानगराच्या पिण्याच्या पाण्याच्या गरजा भागविणाऱ्या प्रमुख जलस्रोतांपैकी एक महत्त्वाचा प्रकल्‍प आहे. या प्रकल्‍पाचे बांधकाम सन १९५४ मध्‍ये पूर्ण करण्‍यात आले आहे. तसेच, या प्रकल्‍पाचे व्यवस्थापन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत करण्‍यात येते. मुंबईपासून १२० किलोमीटर अंतरावर असलेल्‍या या प्रकल्‍पाची लांबी ५४८.६४ मीटर उंची ८२.२९६ मीटर इतकी आहे. एकूण साठवण क्षमतेचे क्षेत्रफळ ४५०.६२५ चौरस किलोमीटर असून मुंबईला केल्‍या जाणा-या एकूण पाणीपुरवठ्यातील योगदान ११.२२ % इतके आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी ‘मोडक सागर’ तलाव हा आज भरून वाहू लागला आहे. तर यापूर्वी यंदाच्या पावसाळ्यात तानसा तलाव हा दिनांक २२ जुलै २०२६ रोजी सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. तर ‘विहार’ तलाव हा दिनांक ७ जुलै २०२६ च्या रात्री ९ वाजता ओसंडून वाहू लागला होता. त्याच दिवशी म्हणजेच दिनांक ७ जुलै २०२६ रोजी रात्री ११ वाजून ४३ मिनिटांनी ‘तुळशी’ तलाव देखील ओसंडून वाहू लागला होता‌. यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ तलावांपैकी आज दिनांक २३ जुलै २०२६ पर्यंत चार तलाव भरुन व ओसांडून वाहू लागले आहेत.

Exit mobile version