मुंबई : मुंबईत एलपीजी गॅस सिलेंडरच्या टंचाईचा परिणाम आता सर्वसामान्य नागरिकांसोबतच पोलिस विभागावरही होताना दिसत आहे. दक्षिण मुंबईतील आझाद मैदान येथील पोलिस कँटीनमध्ये गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असून कँटीनमधील स्वयंपाकघर जवळपास ठप्प झाले आहे. त्यामुळे येथे पूर्वीसारखे नाश्ता व जेवण तयार करणे शक्य राहिलेले नाही.
हे ही वाचा:
होर्मुज सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा
देशात इंधनाचा साठा देशाच्या गरजेपेक्षा जास्त
द्रविडला लाइफटाइम सन्मान, गिल ‘क्रिकेटर ऑफ द ईयर’च्या शर्यतीत
होर्मुझ सामुद्रधुनी भारतीय तेलवाहू जहाजांना खुली!
या कँटीनमध्ये दररोज मोठ्या संख्येने पोलिस कर्मचारी, अधिकारी तसेच परिसरातील कर्मचारी जेवणासाठी येत असत. शेकडो लोकांसाठी रोज नाश्ता आणि जेवण तयार करणारी ही कँटीन आता गॅस सिलेंडरच्या कमतरतेमुळे बंद पडण्याच्या स्थितीत आली आहे. पोलिसांसाठी ही कँटीन महत्त्वाची सुविधा मानली जाते. येथे सकाळच्या चहापासून रात्रीच्या जेवणापर्यंत संपूर्ण व्यवस्था उपलब्ध असायची.
सकाळी चहा, पोहे, उपमा, पराठे असे नाश्त्याचे पदार्थ दिले जात, तर दुपारी व रात्री दाळ, भाजी, भात, पोळी यांसह इतर पदार्थ मिळत असत. व्यस्त ड्युटीमुळे अनेक पोलिस कर्मचारी या कँटीनवर अवलंबून असतात, कारण येथे त्यांना परवडणाऱ्या दरात वेळेवर जेवण मिळत होते.
पोलिस आयुक्तालयातील कँटीनही संकटात…
एलपीजीच्या टंचाईचा परिणाम फक्त आझाद मैदान कँटीनपुरता मर्यादित नसून पोलिस आयुक्त कार्यालयातील कँटीनही त्याच समस्येला सामोरे जात आहे. गॅस सिलेंडर मिळण्यात अडचणी येत असल्याने ही कँटीनही बंद पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या कँटीनमध्येही मोठ्या संख्येने पोलिस अधिकारी व कर्मचारी भोजन करतात.
एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, या कँटीनमध्ये दररोज सरासरी तीन एलपीजी सिलेंडरचा वापर होतो. सकाळपासून रात्रीपर्यंत सतत स्वयंपाक सुरू असल्यामुळे गॅसची खपत जास्त असते. मात्र मागील काही दिवसांपासून एलपीजी सिलेंडरचा पुरवठा अनियमित झाला आहे. अनेकदा एक सिलेंडरही वेळेवर मिळत नाही.
सध्या कँटीनमध्ये फक्त चहा, पोहे आणि दाळ-भात असे मर्यादित पदार्थ उपलब्ध करून दिले जात आहेत. गॅस मिळाला नाही तर पोलिस आयुक्तालयातील कँटीनही बंद करावी लागण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
नव्या पोस्टिंगवरील पोलिसांपुढे अडचणी….
या परिस्थितीचा सर्वाधिक फटका अलीकडेच मुंबईत बदली झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना बसत आहे. शहरात नवीन असल्यामुळे अनेक पोलिस कर्मचारी बॅरकमध्ये किंवा छोट्या भाड्याच्या खोल्यांमध्ये राहतात. अशा ठिकाणी स्वयंपाक करण्याची पूर्ण सुविधा नसल्याने ते रोजच्या जेवणासाठी कँटीनवरच अवलंबून असतात.
मात्र कँटीनमध्ये जेवण मर्यादित झाल्याने आता त्यांना बाहेरील हॉटेल किंवा ढाब्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यामुळे त्यांचा खर्च वाढत असून ड्युटीच्या वेळेत जेवणाची सोय करणेही कठीण झाले आहे. दररोज शेकडो पोलिस कर्मचारी या कँटीनमध्ये नाश्ता व जेवण करत असत. विशेषतः दीर्घकाळ ड्युटी करणाऱ्या पोलिसांसाठी ही कँटीन अत्यंत महत्त्वाची होती.
गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे अनेक पोलिस कर्मचाऱ्यांचे वेळेवर जेवणही होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्या कामकाजावरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी गॅस एजन्सींशी संपर्क साधला असला तरी सिलेंडरच्या कमतरतेमुळे नियमित पुरवठा होऊ शकत नसल्याचे सांगण्यात आले आहे.







