28 C
Mumbai
Saturday, December 20, 2025
घरविशेषधुक्यात हरवला टी २० सामना!

धुक्यात हरवला टी २० सामना!

Google News Follow

Related

क्रिकेट म्हणजे अनिश्चिततेचा खेळ. कधी पावसामुळे सामने वाहून जातात, कधी वादळ, कधी सुरक्षेचा धोका, तर कधी प्रेक्षकांचा अनियंत्रित राडा… क्रिकेटच्या इतिहासात अनेकदा वेगवेगळ्या, कधी कधी धक्कादायक कारणांमुळे सामने रद्द किंवा थांबवावे लागले आहेत.
१९९६ च्या वर्ल्डकपमध्ये कोलकात्यात प्रेक्षकांच्या दंगलीमुळे सामना थांबवावा लागला होता. २००९ मध्ये न्यूझीलंडमध्ये भूकंपामुळे सामना रद्द झाला. २०२१ मध्ये इंग्लंडमध्ये कोविडमुळे सामने रद्द झाले. तर पाकिस्तानमध्ये वाळूच्या वादळामुळेही क्रिकेट थांबले आहे.
मात्र लखनऊमध्ये जे घडलं, ते वेगळंच होतं… इथे पाऊस नव्हता, वादळ नव्हतं, गोंधळ नव्हता—खेळ थांबवणारा घटक होता दाट धुकं!

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना लखनऊच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार होता. मात्र दाट धुक्यामुळे हा सामना एकही चेंडू न टाकता रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हजारो क्रिकेटप्रेमींच्या अपेक्षा धुक्यात विरघळून गेल्या.

नियोजित वेळेनुसार सायंकाळी ६.३० वाजता नाणेफेक होणार होती. पण मैदानावर इतकं दाट धुकं पसरलं होतं की पंचांनी वारंवार पाहणी करूनही खेळासाठी परिस्थिती सुरक्षित नसल्याचं स्पष्ट केलं.

भारतीय हवामान खात्याने (IMD) याआधीच पूर्व व मध्य उत्तर प्रदेशातील १३ जिल्ह्यांसाठी ‘अतिदाट धुक्याचा’ ऑरेंज अलर्ट, तर राज्यातील २७ जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला होता. त्याचा थेट परिणाम या आंतरराष्ट्रीय सामन्यावर झाला.

डिसेंबर महिन्यात लखनऊ पहिल्यांदाच टी-२० आंतरराष्ट्रीय सामना आयोजित करत होता. मात्र स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांना समोरच्या स्टँड्सही नीट दिसत नव्हत्या. फ्लडलाइट्सच्या उजेडातही धुक्याची दाट चादर पसरलेली दिसत होती.

सामना रद्द होण्याचे संकेत सुरुवातीपासूनच मिळत होते.
६.३० वाजताची नाणेफेक आधी ६.५०, त्यानंतर ७.३०, ८.००, ८.३० आणि ९.०० वाजेपर्यंत पुढे ढकलण्यात आली. अखेर रात्री ९.२५ वाजता पंचांनी फलंदाजाच्या क्रीजवरून दृश्यता तपासली. परिस्थितीत कोणताही सुधार न झाल्याने रात्री ९.३० वाजता सामना अधिकृतपणे रद्द करण्यात आला.

पंच के. एन. पंडित आणि अनंतपद्मनाभन यांनी दृश्यतेची विशेष चाचणी घेतली. एका पंचाने पिचच्या एका टोकावरून चेंडू फेकला, तर दुसरा पंच डीप मिडविकेटवर उभा राहून चेंडू दिसतो का हे पाहू लागला. चेंडू स्पष्ट दिसत नसल्याने खेळ सुरू करणे धोकादायक ठरू शकते, असा निर्णय घेण्यात आला.

मालिकेत सध्या भारत २–१ ने आघाडीवर आहे. कटक येथे भारताने पहिला सामना १०१ धावांनी जिंकला होता. त्यानंतर न्यू चंदीगडमध्ये दक्षिण आफ्रिकेने ५१ धावांनी विजय मिळवत मालिका १–१ अशी बरोबरीत आणली. धर्मशाळामधील तिसऱ्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवत पुन्हा आघाडी घेतली.

आता १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये होणारा अंतिम सामना मालिकेचा निर्णायक ठरणार आहे. भारत हा सामना जिंकून मालिका ३–१ ने आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न करेल, तर दक्षिण आफ्रिका २–२ अशी बरोबरी साधण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताचा इतिहास दमदार राहिला आहे. २००६ पासून आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये ३४ टी-२० सामने झाले आहेत. यापैकी भारताने २०, तर दक्षिण आफ्रिकेने १३ सामने जिंकले असून एक सामना बेनतीजा राहिला आहे.

या निर्णायक सामन्यात युवा फलंदाज अभिषेक शर्माकडेही इतिहास घडवण्याची मोठी संधी आहे. विराट कोहलीने २०१६ साली एका कॅलेंडर वर्षात १,६१४ टी-२० धावा केल्या होत्या. अभिषेकने अहमदाबादमध्ये ४७ धावा केल्यास तो एका वर्षात सर्वाधिक टी-२० धावा करणारा भारतीय फलंदाज ठरेल.

पाऊस, वादळ, गोंधळ नाही… तरीही क्रिकेट थांबलं. लखनऊमध्ये धुक्याने खेळ जिंकला, आणि आता साऱ्यांच्या नजरा अहमदाबादकडे लागल्या आहेत…

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा