राज्यातील शेतकरी कर्जमाफी प्रक्रियेला अखेर सुरुवात झाली असून राज्य सरकारने पात्र लाभार्थ्यांच्या पहिल्या यादीची घोषणा केली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि अजित पवार यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर ५५३ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची पहिली यादी जाहीर केली. सरकारने या योजनेसाठी मोठ्या निधीची तरतूद केल्याची माहितीही त्यांनी दिली.
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सांगितले की, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी ३६,५८५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून एकूण ५६ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. तसेच महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना अंतर्गत यापूर्वी लाभ घेतलेल्या १२ लाख शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात विविध जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमधील ५५३ पात्र शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या लाभार्थ्यांच्या निवड प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यात आल्याचा दावा सरकारने केला आहे. लाभार्थ्यांची माहिती आणि निधी वितरणाची प्रक्रिया नियोजनबद्ध पद्धतीने राबवली जात असून, ही योजना केवळ कर्जमाफीपुरती मर्यादित नसून शेतकऱ्यांना पुन्हा सक्षमपणे शेती करण्यासाठी मदत करणारा महत्त्वाचा उपक्रम असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांना नव्याने कर्ज मिळण्यात अडचणी येत होत्या, मात्र आता अशा लाभार्थ्यांना बँकांनी कर्ज देणे बंधनकारक करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
राज्य सरकारने या संपूर्ण कर्जमाफी कार्यक्रमासाठी एकूण 40,980 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यापैकी 36,585 कोटी रुपये नियमित कर्जमाफीसाठी तर महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेतील 12 लाख शेतकऱ्यांसाठी अतिरिक्त 4,395 कोटी रुपये राखीव ठेवण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या इतिहासातील ही सर्वात मोठ्या कर्जमाफींपैकी एक असल्याचा दावा सहकार मंत्र्यांनी केला.
जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीत अमरावती जिल्हा बँकेतील 58, लातूरमधील 133, नागपूरमधील 16, पुणे जिल्ह्यातील 85, साताऱ्यातील 38 आणि ठाणे जिल्ह्यातील 182 अशा एकूण 553 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या सर्व लाभार्थ्यांचे मिळून 2 कोटी 99 लाख 37 हजार 540 रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांची यादी टप्प्याटप्प्याने संकेतस्थळावर अपलोड केली जात असल्याची माहिती देण्यात आली. सुरुवातीला 5 जुलैपर्यंत यादी प्रसिद्ध करण्याचे नियोजन होते, मात्र 2019 च्या कर्जमाफीतील लाभार्थ्यांची पडताळणी आणि शेतीबाह्य उत्पन्नावर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांचा डेटा तपासण्यास वेळ लागल्याने प्रक्रिया उशिरा पूर्ण होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
हे ही वाचा:
लाठीचार्जप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा तातडीच्या सुनावणीस नकार
‘वाघनख’च्या चिन्हासह INS मालवण नौदलात दाखल!
इराणची लष्करी ताकद खिळखिळी करण्याचा अमेरिकेचा प्रयत्न
चर्चा सोडून गदारोळ; लोकसभा तिसऱ्या दिवशीही ठप्प
नियमित कर्जफेड करणाऱ्या 23.63 लाख शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभही देण्यात येणार असून, सुमारे 32 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले सरकार (Aaple Sarkar) केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असून, त्यावेळी कर्जाची रक्कम तपासून प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सहकार विभागाने स्पष्ट केले.
