अंदमान सागरात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा

भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेकडे आणखी एक भक्कम पाऊल

अंदमान सागरात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा

अंदमान सागराच्या खोल गर्भात भारताला नैसर्गिक वायूचा महत्त्वपूर्ण साठा सापडला असून, देशाच्या ऊर्जा सुरक्षेसाठी ही मोठी आणि आशादायी बातमी मानली जात आहे. केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, अंदमान-निकोबार द्वीपसमूहाच्या पूर्व किनाऱ्यापासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री विजयपूरम-३ या क्षेत्रात नैसर्गिक वायूचा शोध लागला आहे. विशेष म्हणजे हा साठा समुद्राच्या पृष्ठभागापासून तब्बल ३५५ मीटर खोलीवर आढळून आला आहे.

सरकारी तेल आणि वायू शोध कंपनी ऑइल इंडिया लिमिटेडने या भागात शोधमोहीम राबवली होती. शोध विहिरीच्या प्राथमिक चाचण्यांमध्ये सातत्याने वायू बाहेर येत असल्याचे स्पष्ट झाल्याने येथे नैसर्गिक वायूचे अस्तित्व असल्याची खात्री पटली आहे. या विहिरीत सुमारे १,९०० मीटरहून अधिक खोलीवर असलेल्या भूस्तरांमध्ये वायूचा साठा आढळून आला आहे. सध्या या वायूचे नमुने गोळा करून त्याची गुणवत्ता, उष्मांक क्षमता आणि रासायनिक संरचना तपासण्याचे काम सुरू आहे.
हे ही वाचा:
दिल्ली अग्निकांड: बांगलादेशींना भारतीय कागदपत्रे मिळवून दिल्याप्रकरणी मालकाला झालेली अटक

सऊदी अरेबियाची नवी समुद्री व्यापार वाट

गुप्तचर यंत्रणांचे प्रमुख राहुल गांधीना रिपोर्ट करतायत?

जागतिक अनिश्चिततेतही भारताची दमदार झेप

हरदीपसिंह पुरी यांनी सांगितले की, अंदमान खोऱ्यात सुरू असलेल्या सध्याच्या शोध मोहिमेत खोदण्यात आलेल्या तीन शोध विहिरींपैकी दोन विहिरींमध्ये हायड्रोकार्बनचे अस्तित्व आढळले आहे. त्यामुळे या परिसरात भविष्यात मोठ्या प्रमाणावर तेल आणि वायूचे साठे सापडण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे. हा शोध भारताच्या ऊर्जा क्षेत्रासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून देशाची आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करू शकतो.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या ‘समुद्र मंथन मिशन’अंतर्गत देशातील खोल समुद्री भागांमध्ये ऊर्जा स्रोतांचा शोध घेण्याचे अभियान वेगाने राबवले जात आहे. त्याच मोहिमेचा हा एक महत्त्वपूर्ण परिणाम मानला जात आहे. अंदमान सागरातील हा नैसर्गिक वायू साठा भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले आणखी एक भक्कम पाऊल मानले जात असून, आगामी काळात देशाच्या आर्थिक आणि औद्योगिक विकासालाही यामुळे मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी यासंदर्भात ट्विट करून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणतात की, अंदमानच्या समुद्रात सापडलेल्या विजयपूरम 3 या विहिरीत सरकारी उपक्रम असलेल्या ऑइल इंडिया लिमिटेड या कंपनीला नैसर्गिक वायूचे आणखी एक घबाड सापडले आहे. राज्यकर्ता जर प्रामाणिक असेल तर परमेश्वर सुद्धा त्याचा हात सोडत नाही, संकट किती मोठे असो.

Exit mobile version