सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे आझाद मैदानात आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत. त्यांच्या मागण्या त्यांनी महायुती सरकारपुढे ठेवल्या असल्या तरी त्यांचा राग हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर आहे हे लपून राहिलेले नाही. या आंदोलनादरम्यान दोन आंदोलकांचा मृत्यू झाला. हा मृत्यू अर्थातच दुर्दैवी आहे. तो कुणामुळे झाला आहे असे अजिबात नाही. पण मनोज जरांगे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुनी ठरवून मोकळे झाले.
ते म्हणाले, आणखी किती खून करायचे? आज आमच्या एका बांधवाला सीएसएमटीवर हृदयविकाराचा तीव्र झटका आला. फडणवीसांनी आज रुग्णवाहिका ठेवली असती तर त्याचा जीव वाचला असता. आमच्या रुग्णवाहिका वाशीला अडवल्या. तिथेच थांबवून ठेवल्या. त्या येऊ दिल्या असत्या तर आज त्या बांधवाचा मृत्यू झाला नसता. देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या एका मुलाचा खून केला”.
दोन खून आमच्या आंदोलकांचे फडणवीसांनी केले. आता या मृतांचे नातेवाईक फडणवीसांनी आमच्या मुलांना का मारले असे विचारत असतील, असा दावा केला. जरांगे यांनी या मागण्या करताना वैयक्तिक आरोप करण्याचा सपाटा लावलेला आहे. मुळात या आंदोलकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. पण यानिमित्ताने सरकारपेक्षा फडणवीसांना लक्ष्य करण्याचा जरांगेचा प्रयत्न हा आरक्षणाच्या विषयापेक्षा फडणवीसांवर चिखलफेक करण्यात अधिक रस असल्याचे एक उदाहरण आहे. खोटे नरेटिव्ह पसरविण्याचा उद्योग जरांगे नेमका का करत आहेत, त्यांना खरोखरच आरक्षण हवंय की, असे नरेटिव्ह पसरविण्यात त्यांना रस आहे, हा प्रश्न निर्माण होतो.
ते पुढे म्हणाले की, मला आताच एक माहिती मिळाली, एक मराठा बांधव आला होता. पण तो आंदोलनासाठी आला होता. लालबागच्या गणपतीचं मंडळ गोरगरिबांसाठी जेवण देण्याचं काम करत होतं. त्यांनी तिथे सांगितलं की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना तुमच्या इथे दर्शनाला आणतोय. मराठा आंदोलकांना जेवण देणं बंद करा. ही काय नियत असते? मला माहिती नाही हे अमित शाह यांना माहिती आहे का? हा सुद्धा एक खोटा नरेटिव्ह जरांगे पसरविण्याचा का प्रयत्न करत आहेत? मुळात लालबागचा राजा गणपती मंडळाच्या वतीने यंदा अन्नछत्र योजना किंवा महाप्रसादाची योजना भक्तांसाठी करण्यात येणार होती, मात्र पालिकेने त्याला परवानगी नाकारली. त्यामुळे तसा महाप्रसाद देण्यात येतच नव्हता. पण मराठा आंदोलकांचे जेवण बंद करा असे कुणीतरी मंडळाला सांगितले म्हणून त्यांनी ते बंद केले, असा दावा जरांगे करत आहेत. हे काय दर्शवते?
जरांगे यांच्या भाषेचा स्तर तर प्रत्येक आंदोलनात कसा घसरत गेला हे आपण पाहिलेले आहे. यंदाही ती परंपरा त्यांनी कायम राखली आहे. जरांगेंनी कशीही भाषा वापरावी आणि उपस्थिती लोकांनी त्याला टाळ्या, शिट्ट्यांनी डोक्यावर घ्यावे हा त्यांचा नित्यक्रम बनला आहे.
हे ही वाचा:
एका मुलाने गोळा टाकला आणि झाला मोठा स्फोट!
मोदी म्हणाले, अभिमानाने बोला, हे स्वदेशी आहे
दिल्ली क्राइम ब्रांचने केले २ कोटींच्या ड्रग्स जप्त
फटाक्यांच्या कारखान्यात स्फोटात दोन ठार
राज्य सरकारमध्ये उच्च शिक्षण मंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांच्यासाठी जरांगे यांनी खालच्या स्तराची भाषा वापरली. ‘मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देता येणार नाही, ते सामाजिक मागास नाहीत. आज वेळ मारून नेण्यासाठी जरी काही मागण्या तशाच मान्य केल्या तरी ते कायदेशीरदृष्ट्या टिकणाऱ्या नसतील. हे राजकीय आरक्षण मिळवण्याची धडपड असून येणाऱ्या पंचायत राज निवडणुकीत ओबीसी आरक्षण घेऊन राजकीय वापर करायचा प्रयत्न सुरू आहेस असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केले होते. त्यावर बोलताना जरांगे म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी मधल्या काळात चांगल काम केलं, त्यामुळे आम्ही त्यांना काही बोलत नव्हतो. पण आता तू नीट राहा, तूच मराठा उपसमितीचा अध्यक्ष होता. मराठ्यांच्या शिव्या खाऊ नको. इथून पुढे मराठा आरक्षणाच्याविरोधात बोलू नको. इथून पुढे वचवच नको, तू फार काही लांब नाही. कोल्हापूरचा म्हणजे तू आमच्या राजघराण्याच्या कचाट्यात आहे. चंद्रकांत पाटलाला काय अक्कल आहे. जरांगे हे सगळ्यांबद्दलच अशी अरे तुरेची भाषा वापरतात. आपण उपोषणाला बसलो आहोत, त्यामुळे आपण कुणालाही फैलावर घेऊ शकतो, लायकी काढू शकतो, अशीच त्यांची भावना झालेली आहे. मंत्री नितेश राणे यांनाही त्यांनी इशारा दिला. नितेश राणेंना चिचुंद्रीची उपमा देत एकदा आंदोलन संपू मग नितेश राणेंना बघतोच.
दरम्यान, रविवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या देखील जरांगे यांना भेटायला गेल्या. त्यावेळी बोलताना त्यांनी आरक्षण मिळविण्याचा अगदी सोपा मार्ग सांगितला. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला एवढं मोठं बहुमत महाराष्ट्राने दिलं आहे. जवळपास २५० आमदार निवडून दिले आहेत. तेव्हा त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा आणि आरक्षण देऊन टाकावे. केंद्रात पण त्यांचे सरकार आहे. त्यांनी एक अधिवेशन बोलवावं ताबडतोब घटनादुरुस्ती करावी आणि द्यावं आरक्षण. सुप्रिया सुळेंनी सुचविलेला हा सोपा मार्ग याआधी महायुतीच्या सरकार येण्याआधी का उपयोगात आणण्यात आला नाही, हा प्रश्न मात्र अनुत्तरित राहिला.
दुसरी बातमी आहे ती राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे प्रमुख राज राजापूरकर यांची. याच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या ओबीसी सेलचे नेते राज राजापूरकर यांनी जरांगे यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले, ‘मी देशाचा नागरिक आहे. म्हणून मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपुस करायला, भेटायला गेलो होतो, मात्र याचा चुकीचा अर्थ घेत असे वाद लावले जात आहेत.
एकीकडे जरांगे यांनी ओबीसीतूनच मराठ्याना आरक्षण मिळाले पाहिजे असा हट्ट धरलेला आहे. जे शक्य नाही, ते ते मागत आहेत. या मागणीवर कोणताही विरोधी पक्ष बोलत नाही. सरकारने आता निर्णय घ्यावा अशी विरोधी पक्षांची भूमिका आहे. पण मग राजापूरकर हे ओबीसी सेलचे प्रतिनिधी म्हणून तिथे भेटायला गेल्यावर ओबीसीतून आरक्षण देता येईल, याबद्दल त्यांचे काय मत आहे हे समोर आलेले नाही. त्यांना ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण देता येईल हे मान्य आहे काय? मान्य असेल तर मग शरद पवारांनाही ते मान्य असेल असे म्हणता येईल. जर मान्य नाही आणि ते समस्त ओबीसींसोबत आहेत, तर मग ते जरांगे यांना भेटायला का गेले, हा प्रश्नही येतोच. एकीकडे भेटायला जायचे पण ओबीसीतून आरक्षण मागू नका असे जरांगेंना सांगायचे पण नाही, ही दुटप्पी भूमिका असल्याचे मत काँग्रेस आणि ओबीसी समाजाकडून व्यक्त होत आहे.
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे यांचा चूळ भरतानाचा एक व्हीडिओ समोर आला आहे. मागे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो असताना त्याच्या शेजारीच जरांगे हे चूळ भरत आहेत. यावर सोशल मीडियावर संताप व्यक्त होत आहे. शिवाजी महाराज, गणेशमूर्ती तिथे असताना असे वर्तन योग्य आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हेच दुसऱ्या कुणी केले असते तर शिवाजी महाराजांच्या अपमानावरून रान उठवले गेले नसते का?







