जायकवाडी जलाशयातून कोणत्याही क्षणी गोदावरी नदीच्या पात्रात पाणी सोडले जाणार आहे. पाणलोट क्षेत्रातून पाण्याची मोठी आवक वाढली आहे यामुळे पाटबंधारे खात्याद्वारे इशारा दिला आहे.
जायकवाडी प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरु असून त्यामुळे पाणलोट क्षेत्रातील नद्या, नाल्यांमधून जायकवाडीच्या जलाशयात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक सुरु झाली आहे. परिणामी या जलाशयातील पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत असून शनिवारी सायंकाळ पर्यंत या प्रकल्पात 80.70 टक्के एवढा पाणीसाठा उपलब्ध झाला.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याची चालू आवक ओळखून या जलाशयाचे जलप्रचलन आराखड्यानुसार जलपातळीचे नियमन करणे गरजेचे आहे, हे ओळखून पाटबंधारे खात्याने जायकवाडीच्या जलाशयातून गोदावरी नदीच्या पात्रात येत्या काळात कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, या खात्याच्या कार्यकारी अभियंता प्र.पु. संत यांनी सर्व जिल्हा प्रशासनास पत्र पाठवून तात्काळ आपआपल्या स्तरावरुन खबरदारीच्या उपाययोजना अवलंबवाव्यात, असे आवाहन केले. विशेषतः गोदावरी नदीच्या पात्राच्या दोन्ही तिरावरील गावांना सतर्कतेचा इशारा द्यावा, नागरीकांनी नदीपात्रात जाऊ नये, पाळीव प्राणी, गुरे-ढोरे, विद्युत मोटारी, शेतीचे साहित्य इत्यादी तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे व स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकांना सतर्क राहण्याचे इशारे द्यावेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.







