मुंबईत मुसळधार पाऊस, पण धरणे अजूनही रिकामी

शहरावर पाणीसंकटाची टांगती तलवार

मुंबईत मुसळधार पाऊस, पण धरणे अजूनही रिकामी

मुंबईत पावसाचा जोर वाढला, रस्ते जलमय झाले, वाहतूक विस्कळीत झाली; मात्र या मुसळधार पावसामागे एक धक्कादायक वास्तव दडले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमध्ये अद्याप अपेक्षित पाणीसाठा झालेला नसून, मुंबईवर पाणीटंचाईचे संकट कायम आहे. शहरात मुसळधार पाऊस कोसळत असला तरी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस न झाल्याने धरणांतील एकूण पाणीसाठा अवघ्या ७.९४ टक्क्यांवर आला आहे. त्यामुळे पावसाच्या सरी सुरू असतानाही मुंबईकरांच्या डोक्यावर पाणीकपातीची टांगती तलवार कायम आहे.

मुंबईला दररोज सुमारे ३,९०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. हा पुरवठा ऊर्ध्व वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांमधून होतो. या धरणांची एकूण साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असली तरी सध्या त्यामध्ये केवळ १ लाख १४ हजार ८६३ दशलक्ष लिटर पाणी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच काळात धरणांमध्ये ३२.८९ टक्के पाणीसाठा होता. यंदा मात्र हा साठा एक अंकी टक्क्यांवर घसरल्याने महापालिकेची चिंता वाढली आहे.
हे ही वाचा:
“पत्रकारांविषयी अपमानास्पद वक्तव्य करण्याचा हेतू नव्हता”

कांजूरमार्ग-घणसोली-बदलापूर मेट्रो-१४ला मोठा ब्रेक

चीनच्या भूमीत भारताचा सुवर्ण पराक्रम! महिला रिले संघाचे यश

७८ वर्षांनंतर पहिली खासगी सोन्याची खाण सुरू

याच पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेने १५ मेपासून संपूर्ण शहरात १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यानंतर १७ जूनपासून औद्योगिक आणि व्यावसायिक वापरासाठी होणाऱ्या पाणीपुरवठ्यात २० टक्के कपात करण्यात आली. बांधकामांसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. भविष्यात धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा न झाल्यास आणखी कठोर उपाययोजना करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

धरणनिहाय पाणीसाठ्याकडे पाहिले तर विहार धरणात ४५.१३ टक्के, तुळशीमध्ये २२.२० टक्के, मोडकसागरमध्ये २०.४६ टक्के, मध्य वैतरणामध्ये १०.९८ टक्के, भातसा धरणात ७.१० टक्के, तर तानसा धरणात केवळ १.८५ टक्के पाणी शिल्लक आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारच्या मंजुरीनंतर राखीव पाणीसाठ्याचा वापर सुरू करण्यात आला आहे.

आता सर्वांच्या नजरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाकडे लागल्या आहेत. मुंबईत कितीही मुसळधार पाऊस झाला तरी धरणांच्या परिसरात दमदार पाऊस झाल्याशिवाय शहराची तहान भागणार नाही. येत्या काही दिवसांत पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला तरच मुंबईकरांना दिलासा मिळेल; अन्यथा जुलैच्या सुरुवातीलाच पाणीकपात आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version