भारतीय हवाई दलाचे प्रमुख, एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी शुक्रवारी मोठा खुलासा करत म्हटले की, मे महिन्यात झालेल्या युद्धादरम्यान त्यांनी अमेरिकेत बनवलेली एफ- १६ आणि चिनी जेएफ- १७ विमानांसह ८- १० पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली. तसेच त्यांनी भारतीय विमाने पाडल्याचे दावेही फेटाळून लावले. पाकिस्तानच्या दाव्यांना त्यांनी “मनोरंजक कथा” म्हटले. हवाई दल प्रमुख म्हणाले की, भारताने एफ- १६ आणि जेएफ- १७ श्रेणीतील लढाऊ विमाने आणि एक पाळत ठेवणारे विमान पाडले.
एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी ऑपरेशन सिंदूरचे वर्णन हे वर्षातील सर्वात महत्त्वाची लष्करी मोहीम म्हणून केले. तसेच या ऑपरेशनने भारताच्या मजबूत हवाई संरक्षण क्षमता आणि संयुक्त- सेवा नियोजनाचे प्रदर्शन केले, असेही ते म्हणाले. ८ ऑक्टोबर रोजी वार्षिक हवाई दल दिनानिमित्त हिंडन एअर बेसवर होणाऱ्या परेडपूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना सिंग म्हणाले की, या मोहिमेत जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे (एसएएम) ही निर्णायक होती. सर्वात लांब मारा हा त्यांच्या (पाकिस्तान) हद्दीत ३०० किमी पेक्षा जास्त होता. मजबूत हवाई संरक्षण पायाभूत सुविधांनी सर्व काही बदलले आहे, असे ते म्हणाले.
कोणत्या भारतीय एसएएम प्रणालीने हल्ले करण्यात आले याची तपशीलवार माहिती त्यांनी दिली नाही. परंतु ते प्रगत एस-४०० क्षेपणास्त्र प्रणालीबद्दल बोलत होते, जी भारताने रशियाकडून खरेदी केली होती आणि ज्याची रेंज ३०० किलोमीटरपेक्षा जास्त आहे असे बोलले जात आहे. एअर चीफ मार्शल एपी सिंग पुढे म्हणाले की, ही कारवाई त्याच्या अचूकतेसाठी आणि परिणामासाठी इतिहासात नोंद केली जाईल. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून एका रात्रीत अचूकतेने हल्ला करण्यात, कमीत कमी जीवितहानी साध्य करण्यात आणि त्यांना गुडघे टेकण्यासाठी भाग पाडण्यात यशस्वी झालो, असे सिंग म्हणाले. त्यांनी १९७१ नंतर सार्वजनिकरित्या उघड होणारी ही पहिलीच विनाशकारी कारवाई असल्याचे म्हटले.
हवाई दल प्रमुखांनी लष्कर, नौदल आणि हवाई दलाला संयुक्तपणे हल्ल्यांचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्याचे श्रेय दिले. ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही अचूक, अभेद्य आणि सटीक असल्याचे सिद्ध केले, असे ते म्हणाले. ऑपरेशन दरम्यान खोट्या माहितीचा भरपूर वापर झाला होता, परंतु आपल्या माध्यमांनी सैन्याला खूप मदत केली. सैनिक लढत असताना जनतेचे मनोबल खचू नये याची वाहिन्यांनी खात्री केली, असे त्यांनी नमूद केले.
हे ही वाचा :
पाक पोलिसांचा नॅशनल प्रेस क्लबवर हल्ला; पत्रकारांना मारहाण
राहुल गांधी परदेशात जाऊन देशाची बदनामी करतात!
जागतिक वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप: मीराबाई चानूने रौप्यपदक जिंकले!
पंतप्रधान मोदींची ‘ही’ गोष्ट युरोपियन नेत्यांनी शिकावी! काय म्हणाले सेमीकंडक्टर कंपनीचे अधिकारी?
पुढे सिंह यांनी म्हटले की, भविष्यातील युद्धे ही मागील युद्धांसारखी नसतील. आपण वर्तमान आणि भविष्यातील युद्धांसाठी तयार राहिले पाहिजे. सर्व सेवा आणि एजन्सींसोबत एकात्मिक दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, आत्मनिर्भरता हा भारतीय हवाई दलाच्या रोडमॅपमध्ये केंद्रस्थानी आहे. LCA Mk1A साठी ऑर्डर देण्यात आल्या आहेत, तर LCA Mk2 आणि इंडियन मल्टी-रोल हेलिकॉप्टर (IMRH) प्रकल्प पाइपलाइनमध्ये आहेत. विविध रडार, प्रणाली आणि स्वदेशी नवोपक्रम विकसित केले जात आहेत. परंतु, जिथे गरज असेल तिथे आम्ही पोकळी लवकर भरून काढण्यासाठी धोरणात्मक तंत्रज्ञानाचा वापर करू, असे सिंग म्हणाले. ९३ व्या हवाई दल दिनानिमित्त ८ ऑक्टोबर रोजी हिंडन हवाई दल तळावर परेड आयोजित केली जाईल. यापूर्वी ६ ऑक्टोबर रोजी रंगीत तालीम होईल. या परेडमध्ये हवाई दल प्रमुख, नौदल प्रमुख आणि लष्कर प्रमुख उपस्थित राहतील.







