पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’च्या १३४ व्या भागात रांची येथे झालेल्या फेडरेशन कप २०२६स्पर्धेत १०० मीटर धावण्यामध्ये राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित करणाऱ्या गुरिंदरवीर सिंह आणि अनिमेष कुजूर यांचे भरभरून कौतुक केले. पंतप्रधानांनी दोन्ही खेळाडूंशी दूरध्वनीवर संवाद साधला आणि त्यांच्या संघर्षाची कहाणीही जाणून घेतली.
पंतप्रधान मोदी यांनी गुरिंदरवीर आणि अनिमेष यांना दोन दिवसांत तीन वेळा राष्ट्रीय विक्रम मोडल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “तुम्ही दोघांनी मोठी कमाल केली आहे. अवघ्या दोन दिवसांत तीन वेळा राष्ट्रीय विक्रम मोडला आहे. तुमच्या जोडीने अप्रतिम कामगिरी केली आहे. आपण संगीतामध्ये जुगलबंदी पाहिली आहे, पण आव्हानांमध्ये जुगलबंदी पाहायला मिळणे ही खूपच खास गोष्ट आहे.”
पंतप्रधानांनी दोन्ही खेळाडूंशी संवाद साधताना त्यांच्या संघर्षाबद्दल विचारले. अनिमेषने सांगितले की त्याने २०२१ मध्ये ऍथलेटिक्समध्ये प्रवेश केला. त्याआधी तो फुटबॉल खेळायचा. राष्ट्रीय स्तरावरील निवड चाचणीत त्याची निवड झाली आणि त्यानंतर त्याचा प्रवास सुरू झाला.
गुरिंदरवीरने सांगितले की, तो आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करू इच्छित होता. ऍथलेटिक्समध्ये येण्याची प्रेरणा त्याला वडिलांकडून मिळाली. १०० मीटर स्पर्धा निवडल्यावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले, पण त्याच्या वडिलांनी त्याला पूर्ण पाठिंबा दिला. लोक म्हणायचे की भारतीय खेळाडूंची शारीरिक रचना १०० मीटरसाठी योग्य नाही, पण वडिलांच्या विश्वासामुळे तो राष्ट्रीय विक्रम करू शकला.
हे ही वाचा:
कागदी नोटांना रामराम? पॉलिमर नोटांचे स्वागत
पुण्यातील विषारी दारूत भिवंडीतील मेथेनॉल!
दुधासाठी रडणाऱ्या ४ वर्षांच्या चिमुरड्याचा पित्याकडून खून
वैभव सूर्यवंशी सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज – शुभमन गिल
अनिमेषने सांगितले की, जेव्हा त्याने ऍथलेटिक्समध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा अनेकांनी शंका व्यक्त केली. मात्र त्याच्या वडिलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि प्रोत्साहन दिले. त्याने सांगितले की कॉमनवेल्थ गेम्समध्ये तो आणि गुरिंदरवीर देशासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करतील.
दोघांनीही सांगितले की ते चांगले मित्र आहेत. पंतप्रधानांनी त्यांच्या खेळाडूवृत्तीचे कौतुक करताना म्हटले की, “एकमेकांना आव्हान देतानाच तुम्ही एकमेकांची मदतही केलीत, हे खरोखरच अद्भुत आहे. पंतप्रधानांनी दोन्ही खेळाडूंना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि ते पुढेही देशाचे नाव उज्ज्वल करतील, असा विश्वास व्यक्त केला.
गुरिंदरवीरने १०० मीटर शर्यत १०.०९ सेकंदांत पूर्ण करून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. अनिमेषने १०.२० सेकंदांची वेळ नोंदवत दुसरे स्थान मिळवले. उपांत्य फेरीत गुरिंदरवीरने १०.१७ सेकंदांची वेळ नोंदवून विक्रम केला होता. मात्र अवघ्या १० मिनिटांनंतर अनिमेषने १०.१५ सेकंदांत धाव पूर्ण करून नवा विक्रम केला. त्यानंतर अंतिम फेरीत गुरिंदरवीरने पुन्हा तो विक्रम मोडला.
पंतप्रधान मोदींनी दोघांशी संवादात म्हटले की त्यांनी देशाचा सन्मान वाढवला आहे आणि भविष्यात आणखी मोठी कामगिरी करतील. त्यांनी सांगितले की एकमेकांना स्पर्धा देणे, पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्याचवेळी एकमेकांना मदत करणे ही खरी खेळाडूवृत्ती आहे.
