पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या १३१ व्या भागात गेल्या वर्षी प्रयागराज येथे पार पडलेल्या महाकुंभाचा उल्लेख करताना ‘केरळ कुंभ’चाही विशेष संदर्भ दिला. ते म्हणाले की, महाकुंभाच्या अद्भुत छायाचित्रांची आठवण प्रत्येकाला असेल. संगमाच्या तीरावर उसळलेली श्रद्धेची प्रचंड लाट आणि पवित्र स्नानाचा तो क्षण जणू भारत आपल्या सनातन चेतनेशी संवाद साधत असल्यासारखा होता. हीच महाकुंभाची परंपरा, तोच माघ महिना आणि तीच श्रद्धा जेव्हा उत्तर ते दक्षिण प्रवास करते, तेव्हा तिला नवी ओळख मिळते, असे त्यांनी सांगितले.
केरळमधील तिरुनवया येथे भारतपुझा नदी काठी शतकानुशतके ‘मामांगम’ ही परंपरा प्रचलित होती, असे त्यांनी नमूद केले. या उत्सवाला अनेक जण ‘महामाघ महोत्सव’ किंवा ‘केरळ कुंभ’ असेही संबोधतात. माघ महिन्यात पवित्र नदीत स्नान करून त्या क्षणाला आयुष्यभराची अविस्मरणीय आठवण बनवणे, हीच या परंपरेची आत्मा असल्याचे त्यांनी सांगितले.
काळाच्या ओघात ही परंपरा जणू लुप्त झाली होती. सुमारे अडीचशे वर्षे हा उत्सव पूर्वीप्रमाणे भव्य स्वरूपात झाला नव्हता. मात्र, आज आपला वारसा पुन्हा ओळखणाऱ्या भारतात इतिहासाने पुन्हा एकदा करवट घेतली आहे, असे पंतप्रधानांनी म्हटले.
हे ही वाचा:
लग्नाच्या आदल्या दिवशी दोन सख्ख्या बहिणींची आत्महत्या
आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीत तेजी
चार सेमीकंडक्टर युनिट्स लवकरच उत्पादन सुरू करणार
यावेळी कोणतीही मोठी घोषणा न करता ‘केरळ कुंभ’ यशस्वीरीत्या पार पडला. लोकांनी परस्परांना माहिती दिली आणि बातमी तोंडी तोंडी पसरत गेली. पाहता पाहता भाविक तिरुनावाया येथे मोठ्या संख्येने दाखल झाले. “महाकुंभ असो किंवा केरळ कुंभ, हे केवळ स्नानाचे पर्व नाहीत; ते स्मृतींचे जागरण आणि संस्कृतीचे पुनर्स्मरण आहे. उत्तर ते दक्षिण नद्या वेगळ्या असल्या, किनारे वेगळे असले तरी श्रद्धेची धारा एकच आहे — हेच भारत आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, पंतप्रधानांनी एआय शिखर परिषद, विद्यार्थ्यांच्या परीक्षा तसेच ‘डिजिटल अरेस्ट’सारख्या सायबर फसवणुकींबाबत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले.







