मालवणी मध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर आता अवैध बांधकामांची चर्चा मुंबईमध्ये जोरात होऊ लागलेली आहे. मुंबईमधील अवैध बांधकामांकडे मुंबई महानगरपालिकेचे सर्वाधिक दुर्लक्ष कोरोना काळात झाले असल्याचे आता समोर आले आहे. ही सर्वाधिक अवैध बांधकामे मुंबईतील चेंबूर एम, चेंबूर एम पश्चिम, कुर्ला एल, विक्रोळी एस या ठिकाणी खुलेआम झालेली आहेत.
गेल्यावर्षी टाळेबंदीच्या दरम्यान कुठलेही बांधकाम सुरु नव्हते. परंतु त्यानंतर मात्र अनधिकृत बांधकामांना पेव फुटल्याचा आकडाच आता समोर आलेला आहे. मालवणी, मालाड येथे परवा एक तीन मजली इमारत कोसळून त्यात १२ जणांचा मृत्यू झाला होता, त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील अनधिकृत इमारती आणि घरांची संख्या आणि त्याकडे होणारे पालिकेचे दुर्लक्ष हा मुद्दा चर्चेत आला आहे. कोरोना काळात पालिकेच्या अतिक्रमण विभागातील कर्मचारी कोरोनासंदर्भातील कामात व्यग्र असल्यामुळे त्याचा फायदा उठवत अशी बांधकामे केल्याचा दावा केला जात आहे.
हे ही वाचा:
ऊर्जा मंत्र्यांनी वीज बिल माफी ढकलली केंद्रावर
ठाकरे सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर
बीएसएफकडून चीनी गुप्तहेराला अटक
टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर या कामाला आणखी वेग आला. आजच्या घडीलाही अवैध बांधकामे सुरुच आहेत. मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये पालिकेकडे १३ हजारांपेक्षा जास्त तक्रारी अवैध बांधकामाच्या आलेल्या आहेत. वर्षभरात एकूण ९ हजार बांधकामांची नोंद याठिकाणी झालेली आहे.
पूर्व उपनगरातील कुर्ला, गोवंडी, मानखुर्द या भागांतून सर्वाधिक अवैध बांधकामाच्या १२०० ते ३२५० तक्रारी समोर आल्या आहेत. कुर्ला परिसरातील साकीनाका भागामध्येही सर्वाधिक बेकायदा बांधकामे असल्याचे समोर आले आहे. यामध्ये फरसाण कारखाना, अवैध गॅरेज, गोदामे यांची संख्या मोठी आहे.







