मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार, ६ मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात मोठी घोषणा केली. शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी कर्ज माफी योजना यावेळी जाहीर केली आहे. यामुळे बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
कर्जमाफी योजना राबवण्याचे आश्वासन देण्यात आले होते त्यानुसार यंदाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीसाठी समिती स्थापन केली होती. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्ज माफी योजना जाहीर केली आहे. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात, त्यांच्यासाठी ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार आहे, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “आम्ही राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं. यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती. राज्यातील ३० सप्टेंबर २०२५ रोजी पर्यंत पीक कर्ज थकित असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येईल. ही कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी कर्जमाफी योजना जाहीर करण्यात आली आहे.”
हे ही वाचा:
अजित पवार यांचे भव्य स्मारक उभारणार
कर्नाटकमध्ये १६ वर्षांखालील मुलांना सोशल मीडियाच्या वापरावर बंदी
श्रीलंकेने इराणच्या ‘IRINS बुशेहर’ला दिला आश्रय
“आधी लक्ष्य इराण, नंतर क्युबा!”
कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबत राज्यातील बँकिग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजन केल्या जात आहेत, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.







