भारत आणि इंडोनेशिया यांच्यातील हजारो वर्षांच्या सांस्कृतिक नात्याला अधोरेखित करणाऱ्या महत्त्वपूर्ण उपक्रमाला बुधवारी (८ जुलै) सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांनी संयुक्तपणे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समाविष्ट असलेल्या हजार वर्षे जुन्या प्रम्बानन हिंदू मंदिर संकुलाच्या जीर्णोद्धार आणि संवर्धन प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा प्रकल्प भारताच्या सहकार्याने राबविण्यात येणार असून, दोन्ही देशांमधील सांस्कृतिक सहकार्याचा नवा अध्याय मानला जात आहे.
उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदींनी मंदिर परिसराला भेट देत पूजा-अर्चा केली. यावेळी दोन्ही देशांचे राष्ट्रीय ध्वज हातात घेऊन मोठ्या संख्येने नागरिकांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी पंतप्रधान मोदी म्हणाले की, “आज दौऱ्याचा तिसरा दिवस आहे, पण येथील जीवनात, संभाषणांमध्ये आणि हवेत संस्कृतीचा सुगंध दरवळत आहे. हा तोच सुगंध आहे जो आपण भारताच्या भूमीवर प्रत्येक क्षणी अनुभवतो. आपल्या सांस्कृतिक वारशाचा हा सुगंध आपल्याला आपलेपणाच्या भावनेतून जोडतो.”
इंडोनेशियातील भक्तीच्या परिचित प्रतिध्वनींनी पंतप्रधानांना विशेषतः प्रभावित केले. ते म्हणाले, “मी कैलास मानसरोवरला प्रवास करो किवा आज इंडोनेशियातील या पवित्र मंदिरात आलो असो, मला तोच प्रतिध्वनी अनुभवायला मिळाला; येथे महामृत्युंजय मंत्राचा जप केला जात होता आणि प्रत्येकजण ‘ओम नमः शिवाय’ म्हणत होता. ही गोष्ट स्वतःच अत्यंत हृदयस्पर्शी होती.”
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, आयुष्यभर भगवान शिवाशी जोडलेले राहता आल्याबद्दल ते स्वतःला भाग्यवान समजतात. ते म्हणाले, “हे माझे भाग्य आहे की मला कोणत्या ना कोणत्या प्रकारे नेहमीच भगवान शिवाशी जोडले जाण्याची संधी मिळते. माझा जन्म वडनगरमध्ये झाला, जिथे हाटकेश्वर महादेव हे एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी पहिले सोमनाथ गुजरातच्या भूमीत वसलेले आहे. माझा राजकीय मतदारसंघ, काशी- येथे काशी विश्वनाथ महादेवांचा आशीर्वाद माझ्यावर सतत आहे.”
हे ही वाचा:
पाकिस्तानी मालवाहू विमानाचा कराचीजवळ रडारशी संपर्क तुटला
मुंबईच्या पाणीसाठ्याला ‘मान्सून बूस्ट’; सात धरणांमध्ये ४१.३६ टक्के पाणीसाठा
शोपियान मध्ये ‘लष्कर’च्या टॉप कमांडरला घातल्या गोळ्या
बंगालमध्ये बलात्कार-हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस चकमकीत ठार
भारतातील प्रमुख मंदिर जीर्णोद्धार प्रकल्पांची आठवण करून देताना पंतप्रधान म्हणाले की, प्रबननच्या पुनरुज्जीवनाशी आता जोडले गेल्याने ते स्वतःला भाग्यवान समजतात. “केदारधामचा पुनर्विकास असो किवा उज्जैन महाकालचा पुनर्विकास असो, किंवा आज येथे येऊन आपल्या सांस्कृतिक वारशाचे पुनरुज्जीवन आणि नूतनीकरण करण्याचे भाग्य लाभणे असो जो सुमारे एक हजार ते बाराशे वर्षे जुना आहे आणि ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्या स्मृतींशी जोडलेला आहे मी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजतो,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
प्रम्बानन मंदिराच्या संवर्धनासाठी भारताने तांत्रिक आणि पुरातत्त्वीय सहकार्य देण्याचे मान्य केले आहे. या प्रकल्पात भारतातील पुरातत्त्व तज्ज्ञ आणि संवर्धन क्षेत्रातील विशेषज्ञ सहभागी होणार आहेत. मंदिराच्या मूळ वास्तुशैलीचे जतन करत त्याचे वैज्ञानिक पद्धतीने पुनरुज्जीवन केले जाणार आहे.
काय आहे प्रम्बानन मंदिराचे महत्त्व?
इंडोनेशियातील योग्याकार्ता येथे असलेले प्रम्बानन मंदिर संकुल हे नवव्या शतकात उभारले गेले असून ते इंडोनेशियातील सर्वात मोठे हिंदू मंदिर मानले जाते. हे मंदिर त्रिमूर्ती – भगवान शिव, भगवान विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांना समर्पित आहे. मंदिराच्या भिंतींवर रामायण आणि इतर हिंदू पुराणांतील प्रसंगांचे सुंदर शिल्पांकन करण्यात आले आहे. १९९१ मध्ये या मंदिराचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्यात आला.
