सबरीमला मंदिरातील साडेचार किलो सोनं गायब

SIT चा अंतिम अहवाल पुढील आठवड्यात

सबरीमला मंदिरातील साडेचार किलो सोनं गायब

देशातील सर्वात प्रसिद्ध आणि श्रद्धेचे केंद्र मानल्या जाणाऱ्या केरळमधील सबरीमला मंदिरातील तब्बल ४.५४ किलो सोने गायब झाल्याच्या प्रकरणाने पुन्हा एकदा वेग घेतला आहे. या अत्यंत संवेदनशील प्रकरणाचा तपास करणारे विशेष तपास पथक अर्थात SIT आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, पुढील आठवड्यात न्यायालयात अंतिम अहवाल सादर केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बहुचर्चित प्रकरणातील जबाबदार व्यक्तींवर मोठी कारवाई होण्याची चिन्हे दिसत आहेत.

हे प्रकरण २०१९ मधील मंदिराच्या जीर्णोद्धाराशी संबंधित आहे. मंदिरातील द्वारपाल मूर्ती, गर्भगृहाच्या चौकटी आणि इतर सोन्याचा मुलामा दिलेल्या वस्तूंना नव्याने गोल्ड प्लेटिंग करण्यासाठी चेन्नईतील एका खासगी कंपनीकडे पाठविण्यात आले होते. तपास यंत्रणांचा संशय आहे की, याच प्रक्रियेदरम्यान मूळ सोन्याचा थर रासायनिक पद्धतीने काढून त्याची अफरातफर करण्यात आली.
हे ही वाचा:
मोदी सरकारच्या काळात १ कोटी १८ लाख किलो ड्रग्ज जप्त

टीईटी परीक्षेचा पेपर फुटला; शिक्षक पात्रता परीक्षा पुढे ढकलली

“पत्रकारितेचे स्वातंत्र्य म्हणजे नागरिकांना छळण्याचा परवाना नाही”

फॉक्सवॅगनमध्ये तब्बल १ लाख कर्मचाऱ्यांच्या

मूर्ती आणि इतर वस्तू मंदिरात परत आल्यानंतर त्यांचे वजन करण्यात आले नव्हते. मात्र नंतर न्यायालयीन पाहणीत आणि विशेष आयुक्तांच्या अहवालात गंभीर विसंगती समोर आली. तपासात मंदिरातील विविध भागांमधून एकूण ४.५४ किलो सोने गायब झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत केरळ उच्च न्यायालयाने विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश दिले होते.

तपासादरम्यान सहाय्यक पुजारी उन्नीकृष्णन पोट्टी याला अटक करण्यात आली होती. मंदिरातील सोन्याचा मुलामा दिलेल्या मूर्ती आणि इतर वस्तू पुनर्प्लेटिंगसाठी पाठविण्याची जबाबदारी त्याच्याकडे असल्याचा आरोप आहे. तीन महिन्यांहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला असला, तरी SIT ने त्याची अनेक वेळा सखोल चौकशी केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत ११ जणांना आरोपी करण्यात आले असून, तांत्रिक तज्ज्ञ, मंदिर प्रशासनातील अधिकारी आणि संबंधित व्यक्तींचीही कसून चौकशी करण्यात आली आहे.

शुक्रवारी SIT ने मुख्य आरोपीची तब्बल आठ तास चौकशी केली. तपास जवळपास पूर्ण झाल्याची माहिती न्यायालयालाही देण्यात आली आहे. त्यामुळे अंतिम अहवाल आणि संभाव्य आरोपपत्राकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या अहवालाच्या आधारे संबंधित आरोपींवर न्यायालयीन खटला चालविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

सबरीमला मंदिर हे कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. दरवर्षी लाखो भक्त येथे दर्शनासाठी येतात आणि मोठ्या प्रमाणात सोने व इतर मौल्यवान वस्तू दान करतात. अशा परिस्थितीत मंदिरातील सोन्याच्या कथित अफरातफरीचे प्रकरण केवळ आर्थिक गैरव्यवहार नसून, ते भाविकांच्या श्रद्धेशी आणि मंदिर प्रशासनावरील विश्वासाशी संबंधित अत्यंत संवेदनशील प्रकरण मानले जात आहे. त्यामुळे SIT च्या अंतिम अहवालातून नेमके किती सोने गायब झाले, त्यामागील कट कोणाचा होता आणि दोषींवर कोणती कारवाई होणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version