कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील फेरफार करून “मत चोरी” झाल्याचा आरोप केला आहे. हा दावा भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांनी फेटाळून लावला. दरम्यान, प्रमुख निवडणूक विश्लेषक व लोकनीती-CSDS चे सहसंचालक संजय कुमार यांनी अशाच तथाकथित वोटचोरीबाबत एक पोस्ट नंतर डिलीट केली. त्यामुळे या वादाला नवी फोडणी मिळाली आहे.
संजय कुमार यांचा दावा
संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी X (पूर्वी ट्विटर) वर पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी महाराष्ट्रातील नाशिक पश्चिम आणि हिंगणा—लोकसभा (२०२४) आणि विधानसभा (२०२४) निवडणुकांदरम्यान मतदारसंख्येत प्रचंड वाढ झाल्याचे दाखवले.
- नाशिक पश्चिम: ३,२८,०५३ वरून ४,८३,४५९ (४७.३८% वाढ)
- हिंगणा: ३,१४,६०५ वरून ४,५०,४१४ (४३.०८% वाढ)
हा डेटा कॉंग्रेसच्या ‘मत चोरी’च्या आरोपांना बळकटी देणारा ठरला. मात्र, नंतर संजय कुमार यांनी ती पोस्ट डिलीट करून माफी मागितली. त्यांनी स्पष्ट केले, आमच्या डेटा टीमकडून रकाने वाचताना चुकी झाली. चुकीचा डेटा टाकल्याबद्दल मी दिलगीर आहे. चुकीची माहिती पसरवण्याचा माझा हेतू नव्हता.”
भाजपाचा प्रतिहल्ला
भाजपाने संजय कुमार यांना “गैरजबाबदार” ठरवत आरोप केला की त्यांनी जाणूनबुजून कॉंग्रेसच्या कथानकाला खतपाणी घातले.
भाजप नेते अमित मालवीय म्हणाले, ही निष्पापपणे केलेली चूक नव्हती. काँग्रेसला खुश करण्याच्या घाईत CSDS ने पडताळणी न करता डेटा टाकला. हे विश्लेषण नाही तर पूर्वग्रहदूषित वर्तन आहे.”
हे ही वाचा:
महाराष्ट्रात ४२,८९२ कोटींची गुंतवणूक
बी. सुदर्शन रेड्डी इंडी आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार
जीडीपी वाढ २०२६ च्या पहिल्या तिमाहीत ६.७ टक्के राहण्याचा अंदाज
पहिल्या रिमूव्हेबल सोलर पॅनल सिस्टमचे स्थापन
भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी तर प्रश्न केला, संजय कुमार मान्य करतात की, त्यांचा डेटा खोटा होता. या बनावट माहितीवरून काँग्रेसने निवडणूक आयोगावर हल्ला केला. मग काँग्रेस महाराष्ट्र आणि त्याच्या जनतेची माफी मागणार का?”
राहुल गांधींचे आरोप
राहुल गांधी यांनी आधीपासूनच महाराष्ट्रातील निवडणुकांत ७६ लाख मतदारांची वाढ झाल्याचा मुद्दा उपस्थित करून “मत चोरी”चा आरोप केला आहे.
७ ऑगस्टच्या पत्रकार परिषदेत त्यांनी कर्नाटकमधील महादेवपुरा विधानसभा क्षेत्रातील उदाहरण देत निवडणूक आयोगाने भाजपच्या सांगण्यावरून मतदार याद्यामध्ये फेरफार केल्याचे सांगितले. त्यांनी हे “भाजपला लाभ होण्यासाठी केलेले देशव्यापी फसवणूक असल्याचे म्हटले.
या आरोपांमुळे INDIA आघाडीने निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात महाभियोग प्रस्तावाची मागणी सुरू केली आहे.
निवडणूक आयोगाची भूमिका
निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेत राहुल गांधींचे दावे “बिनबुडाचे” ठरवत फेटाळून लावले. त्यांनी म्हटले, जर राहुल गांधींकडे पुरावे असतील, तर प्रतिज्ञापत्र सादर करून पुरावे द्या किंवा माफी मागा.
निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, मतदार याद्यांतील अद्ययावत कामकाज पारदर्शक असते. ज्यात मृत, स्थलांतरित किंवा पुनरावृत्ती झालेले मतदार वगळले जातात. त्याचा उद्देश कोणाच्याही मताधिकाराला धोका पोहोचवणे नसतो.







