गेल्या फेब्रुवारीत रोहित शर्माने विराट कोहलीकडून भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्याच्याकडून अर्थातच सगळ्यांच्या अपेक्षा होत्या. भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही रोहितकडून अपेक्षा असल्याचे म्हटले होते. पण त्यानंतर भारतीय संघ टी-२० वर्ल्डकपमध्ये अंतिम फेरीत पोहोचण्यात अपयशी ठरला. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीतही भारताला अपयश आले. तसेच दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेत भारताची कामगिरी सुमार राहिली. या सगळ्या पार्श्वभूमीवर सुनील गावस्कर हे रोहितच्या कामगिरीबद्दल नाखुश आहेत.
इंडियन एक्स्प्रेसच्या कार्यक्रमात बोलताना गावस्कर यांनी रोहितच्या कर्णधारपदाबद्दल नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की, मला त्याच्याकडून बरीच अपेक्षा होती पण तुम्ही परदेशात जेव्हा चांगली कामगिरी करता तेव्हा खऱ्या अर्थाने तुमची कसोटी लागते. पण त्या बाबतीत रोहित शर्माने निराशा केलेली आहे. टी-२० प्रकारात त्याच्याकडे असलेला आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव, कर्णधार म्हणून त्याने खेळलेले शेकडो सामने, आयपीएलमध्ये सर्वोत्तम खेळाडू म्हणून मिळविलेला सन्मान या सगळ्याचा विचार करता आपण टी-२० वर्ल्डकपच्या अंतिम फेरीत पोहोचू शकलो नाही हे निराशाजनक आहे.
भारतीय संघाच्या या पराभवाचे योग्य आढावा, समीक्षण निवड समिती आणि बीसीसीआयकडून केले जायला हवे. विशेषतः जागतिक कसोटी अजिंक्यपद स्परअधेत भारताला गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाकडून जो पराभव पत्करावा लागला त्यानुसार प्रशिक्षक राहुल द्रविड आणि कर्णधार रोहित यांना त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल विचारणा व्हायला हवी.
हे ही वाचा:
१९ बंगल्यांशेजारी ठाकरेंच्या आशीर्वादाने उभारलेल्या अनधिकृत रिसॉर्टवर हातोडा पडणार
मनीलाँड्रिगचे आरोप असलेले साकेत गोखले तृणमूलचे राज्यसभा उमेदवार
बेहिशोबी मालमत्ता जमवणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी अटकेत
धक्कादायक! गोरेगावमध्ये रिक्षात महिलेवर अतिप्रसंग
त्यांना हे विचारायला हवे की, तुम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का घेतलात? ठीक आहे नाणेफेकीच्या वेळी हे सांगण्यात आले की, ढगाळ वातावरण असल्यामुळे आपण तो निर्णय घेतला. त्यानंतर आणखी एक प्रश्न शिल्लक राहतो तो म्हणजे ट्राविस हेडला उसळत्या चेंडूंचा सामना करणे कठीण जाते हे माहीत असतानाही त्याने ८० धावा केल्यावर त्याला उसळते चेंडू का टाकण्यात आले. आम्ही जेव्हा समालोचन करत होतो तेव्हा रिकी पॉन्टिंग सांगत होता की, त्याला उसळता चेंडू टाका. पण ते कुणीही केले नाही.
कसोटी स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभूत झाल्यानंतर आपण तयारीत कमी पडलो असे रोहित म्हणाला होता. त्यावर गावस्कर म्हणाले की, कोणत्या तयारीबद्दल बोलतो आहोत आपण? जर खरोखरच तयारी करायची असेल तर प्रत्यक्ष सामन्यापूर्वी १५ दिवसांत सराव सामने खेळा.
संघात निवडले जाण्याची शक्यता असतानाही संघातील ज्येष्ठ खेळाडूंच्या उदासिनतेवरही गावस्कर बोलले. ते म्हणाले की, जे प्रमुख खेळाडू आहेत ते परदेश दौऱ्यावर थोडे आधी जाण्यास तयार नसतात. कारण त्यांना माहीत असते की, काहीही झाले तरी त्यांची निवड निश्चित आहे. शिवाय, जेव्हा ते लवकर जातात तेव्हा आपल्यावर कसे भरपूर कामाचे ओझे आहे असेही ते म्हणतात. जर तुम्ही जगातील सर्वात तंदुरुस्त संघ म्हणून सांगता तर एवढ्या लवकर तुम्ही थकता कसे? जेव्हा तुम्ही टी-२० सामने खेळता तेव्हा कसला ताण असतो तुमच्यावर?
सर्वप्रथम १० हजार कसोटी धावा करणारे गावस्कर यांनी प्रशिक्षकांच्या जबाबदारीबद्दलही भाष्य केले. ते म्हणाले की, विराट कोहली शास्त्री यांच्या काळापासून विक्रम राठोड फलंदाजी प्रशिक्षक आहे. म्हांब्रे द्रविडसोबत प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे. जर फलंदाज वारंवार त्याच चुका करत असेल तर त्यांना विचारले पाहिजे की तुझ्या फलंदाजीच्या तंत्रात नेमका काय बिघाड झाला आहे? त्या फलंदाजाचे तंत्र कसे सुधारता येईल याचा विचार व्हायला हवा. ते तुम्ही कधी सांगितले का?
सेहवागचे दिले उदाहरण
गावस्कर यांनी उदाहरण दिले की, एकदा वीरेंद्र सेहवाग खराब फॉर्ममध्ये होता. तेव्हा मी त्याला सांगितले की, तुला ऑफ स्टम्पवर गार्ड घ्यावा लागेल. तेव्हा त्याने प्रतिप्रश्न केला की, काय सनीभाई? तेव्हा मी म्हटले की, तुझे फूटवर्क उत्कृष्ट नाही. म्हणून तू ऑफ स्टम्पवर गार्ड घे. जेणेकरून तुला हे कळेल की चेंडू हा ऑफ स्टम्पच्या बाहेर आहे अथवा नाही.







