सोरेन सरकार झुकलं; JSSC-CGLसह TDPLच्या परीक्षा रद्द

उपोषण मागे पण सीबीआय चौकशीसाठी ठाम

सोरेन सरकार झुकलं; JSSC-CGLसह TDPLच्या परीक्षा रद्द

झारखंडमध्ये सरकारी भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या आरोपांविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील झारखंड सरकारने JSSC-CGL परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खासगी एजन्सी टीएसआर डेटा प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड (TDPL) मार्फत २०१४ पासून घेण्यात आलेल्या सर्व परीक्षा, त्यांचे निकाल आणि त्यावर आधारित निवड प्रक्रियाही रद्द करण्यात येणार आहे. या निर्णयानंतर विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनी १६ दिवसांपासून सुरू असलेले उपोषण मागे घेतले. उममे हबीबा आणि राहुल क्रांती यांनीही उपोषण सोडले.

सोमवारी झालेल्या विशेष मंत्रिमंडळ बैठकीनंतर सरकारने हा निर्णय जाहीर केला. भरती प्रक्रियेतील कथित अनियमितता आणि परीक्षा व्यवस्थेच्या पारदर्शकतेवर उपस्थित झालेल्या प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने २०१४ पासून राज्यात झालेल्या भरती परीक्षांमधील कथित गैरप्रकारांची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी सीआयडीकडून तपास केला जाणार आहे. यापूर्वी झालेल्या एसआयटी आणि सीआयडी चौकशीमध्ये परीक्षा गैरप्रकारांशी संबंधित काही गंभीर बाबी समोर आल्याचे मुख्यमंत्री सोरेन यांनी सांगितले. या प्रकरणात विविध कंपन्यांचा संभाव्य सहभाग आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.

झारखंड सरकारने परीक्षा आणि भरती प्रक्रियेत सुधारणा करण्यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. वरिष्ठ आयएएस अधिकारी अमिताभ कौशल यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. विविध सरकारी संस्था, तज्ज्ञ आणि संबंधित घटकांशी चर्चा करून राज्यातील परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी आवश्यक सुधारणा सुचवण्याची जबाबदारी समितीवर असेल.

मात्र, विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. सरकारने सीआयडी चौकशीचे आदेश दिले असले तरी आंदोलकांची सीबीआय चौकशीची मागणी कायम आहे. त्यामुळे परीक्षा रद्द झाल्यानंतरही या प्रकरणातील चौकशीवरून पुढील काळात सरकार आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष होण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा:

हिंद महासागरावर भारताचा ‘ड्रोन वॉच’; नौदलाला मिळणार MQ-9B सी गार्डियनची ताकद

भाजपाची ‘नबीन’ जबाबदारी, गोयल कोषाध्यक्ष, तावडे महासचिव

झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या कार्यालयात छापा

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष भेटून प्रश्न सोडवा! राहुल गांधींचे सोरेन यांना पत्र

झारखंडमध्ये सरकारी भरती परीक्षांमधील कथित अनियमितता आणि पेपरफुटीच्या आरोपांविरोधात विद्यार्थ्यांनी २५ जुलैपासून आंदोलन सुरू केले होते. सुरुवातीला काही विद्यार्थ्यांनी रांचीतील वपू वाटिका मैदानावर आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनाला व्यापक स्वरूप आले. विद्यार्थी नेते देवेंद्र नाथ महतो यांनीही आंदोलनात सक्रिय सहभाग घेत विद्यार्थ्यांच्या मागण्यांसाठी आवाज उठवला. तब्बल २४ दिवस चाललेल्या या आंदोलनानंतर सरकारने JSSC-CGL परीक्षा रद्द करण्यासह TDPLशी संबंधित परीक्षा रद्द करण्याचा आणि परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याचा निर्णय घेतला.

Exit mobile version